पुढारी वृत्तसेवा
जागल्या • मयुरेश वाटवे
गोव्याला निवडणुकीची चाहूल लागली आहे. मात्र प्रत्यक्ष निवडणूक लढाईपेक्षा युतीच्या चर्चा, अटी-शर्तींच्या आणि एकमेकांची ताकद आजमावण्याच्या खेळ अधिक रंगलेला दिसत आहे. आम आदमी पार्टी आणि रिव्होल्युशनरी गोवन्स पक्षाने काँग्रेससोबत युती करण्याची भूमिका घेतली असली, तरी या युतीला सुरुवातीपासून 'रायडर' जोडलेले आहेत. त्यामुळे ही आघाडी प्रत्यक्षात किती पुढे जाते, जागावाटपाच्या पलीकडे तिचे स्वरूप काय राहते आणि निवडणुकीच्या मैदानात तिचा एकत्रित परिणाम किती होतो, याचे उत्तर अद्याप मिळायचे आहे.
काँग्रेसकडून सकारात्मक प्रतिसाद न मिळाल्यास त्यांना इतर पर्यायांचाही विचार करावा लागेल.
एकीकडे दक्षिण गोव्यावर जवळपास सर्व विरोधी पक्षांनी आपले लक्ष केंद्रित केले आहे. दुसरीकडे उत्तर गोव्यात भाजप वगळता इतर पक्षांच्या हालचाली तुलनेने जवळपास नाहीतच.
दक्षिण दिग्विजयच्या प्रयत्नात विरोधक एकमेकांविरुद्ध उभे राहत असतील आणि उत्तर गोव्यात संघटनात्मक पातळीवर भाजपला मोकळे मैदान मिळत असेल, तर निवडणुकीचा अंतिम निकाल विरोधकांच्या अपेक्षांपेक्षा पूर्णपणे वेगळा लागू शकतो.
पुढारीच्या अभ्यासातून भाजपच्या खात्रीशीर मानल्या गेलेल्या १३ मतदारसंघांपैकी सात मतदारसंघ उत्तर गोव्यात असल्याचे चित्र समोर येते. त्याशिवाय असे सहा मतदारसंघ आहेत जिथे उमेदवार बदल, संघटनात्मक ताकद किंवा पक्षाने अधिक लक्ष घातले, तर भाजपची स्थिती आणखी मजबूत होऊ शकते.
भाजप मजबूत उत्तर गोवा आणि दक्षिण गोव्यातील काही मतदारसंघांत, तर सध्या किमान तीन विरोधी पक्षांनी - काँग्रेस, आम आदमी पार्टी आणि गोवा फॉरवर्ड - केवळ दक्षिण गोव्यातच लक्ष केंद्रित केले असून ते एकमेकांचेच मते फोडणार आहेत. अर्थात, निवडणूक अद्याप दूर आहे आणि मतदारांचा अंतिम कौल आज सांगता येणार नाही. पण राजकीय पक्षांनी ज्या भागाकडे दुर्लक्ष केले आहे, त्या भागात प्रतिस्पर्धी पक्षाने आपले संघटन घट्ट केले तर त्याची किंमत नंतर मोजावी लागेल.
विरोधकांसमोरचा सर्वात मोठा धोका म्हणजे मतविभाजन. दक्षिण गोव्यात २० मतदारसंघांत अनेक विरोधी पक्ष एकमेकांविरुद्ध उमेदवार उभे करणार असतील, तर भाजपविरोधी मतांची बेरीज कितीही मोठी असली तरी ती एका उमेदवारामागे एकवटली नाही, तर त्याचा थेट फायदा भाजपला होऊ शकतो. त्यामुळे विरोधकांची राजकीय बेरीज कागदावर कितीही प्रभावी असली तरी मैदानातील तिचे विभाजन झाले, तर ती बेरीज भाजपच्या पथ्यावर पडणार आहे.
युतीचे भवितव्य अनिश्चित:आम आदमी पार्टी आणि रिव्होल्युशनरी गोवन्स पक्षाने काँग्रेससोबत युतीची बोलणी सुरू केली असली, तरी ती केवळ विशिष्ट मतदारसंघांपुरती मर्यादित ठेवण्याच्या अटींमुळे चर्चा फिस्कटण्याची शक्यता आहे.
दक्षिण गोव्यातच सर्व विरोधकांची गर्दी:दक्षिण गोव्यातील २० मतदारसंघांवर सर्व विरोधी पक्ष लक्ष केंद्रित करत असल्याने तिथे मतविभाजनाचा फायदा थेट भाजपला मिळण्याची चिन्हे आहेत.
उत्तर गोव्यात भाजपला मोकळे रान:उत्तर गोव्यातील २० जागांवर विरोधी पक्षांची कोणतीही मोठी हालचाल दिसत नसून, तिथे भाजपचे वर्चस्व कायम राहण्याची शक्यता आहे.
काँग्रेसची संथ भूमिका:विरोधी पक्षांना खरेच युती करायची आहे की लोकांच्या डोळ्यांत धूळ फेकायची आहे, असा प्रश्न उपस्थित होत असून, काँग्रेसकडून ठोस भूमिकेचा अभाव दिसून येत आहे.
तिसऱ्या आघाडीची शक्यता:युती न झाल्यास राज्यात 'तिसरी आघाडी' उभी राहून विरोधकांचेच मतदान विभागले जाण्याची भीती व्यक्त केली जात आहे.