

पणजी : पुढारी वृत्तसेवा
गोवा वैद्यकीय महाविद्यालय (जीएमसी), बांबोळी येथील राज्य अवयव आणि ऊतक प्रत्यारोपण संस्थेच्या एका अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार, गोव्यात १०० हून अधिक रुग्ण किडनी प्रत्यारोपणाच्या प्रतीक्षेत आहेत.
अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार, आतापर्यंत ५१ किडनी प्रत्यारोपण जिवंत दात्यांकडून, तर १६ प्रत्यारोपण मृत दात्यांकडून करण्यात आले आहेत. त्यामुळे गोव्यातील किडनी प्रत्यारोपणांची एकूण संख्या ६७ झाली आहे.
गोव्यात आतापर्यंत आठ मृत दात्यांकडून अवयवदान करण्यात आले आहे. त्यातून १६ मूत्रपिंडे, सात यकृत, चार ह्रदये आणि दोन फुफ्फुसे उपलब्ध झाली. या अवयवांच्या प्रत्यारोपणामुळे देशभरातील सुमारे २९ रुग्णांचे प्राण वाचवण्यास मदत झाली, असे अधिकाऱ्याने सांगितले.
महत्त्वाचे अवयव निकामी झालेल्या रुग्णांसाठी प्रत्यारोपण हा अनेकदा एकमेव उपचाराचा पर्याय ठरतो. एका दात्याच्या अवयव आणि ऊतकदानातून अनेक रुग्णांना मदत होऊ शकते. दान केलेल्या कॉर्नियामुळे दृष्टी परत मिळवण्यास मदत होते, तर दान केलेली त्वचा गंभीर भाजलेल्या रुग्णांच्या उपचारासाठी उपयोगी ठरते, असेही अधिकाऱ्याने स्पष्ट केले.
जीएमसीच्या मूत्रविज्ञान विभागाचे प्राध्यापक तथा विभागप्रमुख डॉ. मधुमोहन प्रभुदेसाई यांनी सांगितले की, सध्या गोव्यात केवळ किडनी प्रत्यारोपणाची सुविधा उपलब्ध आहे. इतर अवयवांचे प्रत्यारोपण राज्यात अद्याप सुरू झालेले नाही. त्यामुळे उपलब्ध होणारे इतर अवयव देशातील गरजू रुग्णांसाठी संबंधित राज्यांमध्ये पाठवले जातात.
जीएमसीमध्ये अवयवदानाची सुरुवात २०११ मध्ये एका व्यक्तीला ब्रेन डेड घोषित केल्यानंतर त्याच्या नातेवाईकांनी पुढाकार घेऊन अवयवदान केल्याने झाली. त्यानंतर जीएमसी तसेच खासगी रुग्णालयांमध्ये जवळपास ७० किडनी प्रत्यारोपणाच्या शस्त्रक्रिया करण्यात आल्याचे डॉ. प्रभुदेसाई यांनी सांगितले.
किडनी प्रत्यारोपण ही अत्यंत तांत्रिकदृष्ट्या आव्हानात्मक प्रक्रिया आहे. ही केवळ एका डॉक्टरची जबाबदारी नसून पाच ते सहा शल्यचिकित्सक, भूलतज्ज्ञ, परिचारिका आणि इतर तज्ज्ञांचा समावेश असलेला मोठा सांघिक प्रयत्न असतो. या शस्त्रक्रियेला साधारण चार ते सहा तास लागतात.
संसर्ग होणे आणि प्रत्यारोपित अवयव शरीराने नाकारणे ही त्यातील प्रमुख आव्हाने आहेत, असे डॉ. प्रभुदेसाई यांनी सांगितले. मृत दात्याकडून अवयव मिळाल्यानंतर ते तातडीने संबंधित ठिकाणी पोहोचवणे आवश्यक असते. यकृत साधारण आठ तासांपर्यंत, तर मूत्रपिंड २४ तासांपर्यंत साठवून ठेवता येते, असेही त्यांनी स्पष्ट केले.