

पणजी : दीपक जाधव
मान्सून १ जूनला केरळमध्ये येणे अपेक्षित असताना यावर्षी तो चार दिवस उशिराने म्हणजेच ४ जूनला दाखल झाला. मान्सून सध्या महाराष्ट्रात दाखल झाला आहे. भारतीय हवामान विभागाच्या नवीन निकषांप्रमाणे, भारतीय उपखंडात मान्सून वेगवेगळ्या भागात ८ जुलैपर्यंत पोचतो. म्हणजेच मान्सूनला केरळमध्ये दाखल झाल्यानंतर देशभरात पसरायला सरासरी ३८ दिवस लागतात.
गेल्या २५ वर्षांच्या काळात २००२ साली मान्सूनला देशभरात पोहोचण्यासाठी सर्वाधिक ७८ दिवस लागले होते, तर २०१३ मध्ये अवघ्या १५ दिवसांत मान्सूनने देश व्यापला होता. २००२ मध्ये मान्सून केरळमध्ये २९ मे रोजी दाखल झाला होता. मात्र, खराब हवामानामुळे संपूर्ण देश व्यापायला १५ ऑगस्ट उजाडावा लागला. गेल्या २५ वर्षांच्या देश व्यापण्यासाठी लागलेला तो सर्वाधिक कालावधी ठरला.
हवामान आकडेवारीनुसार, खात्याच्या पूर्वीच्या निकषांनुसार पावसाला संपूर्ण भारतीय उपखंडात पोहोचण्यासाठी ४५ दिवस लागत. त्यानुसार १५ जुलैपर्यंत मान्सूनचे आगमन देशभरातील सर्व भागांत व्हायचे. मात्र, हवामान खात्याच्या नवीन निकषांनुसार ३८ दिवसांचा कालावधी लागतो, असे दिसून आले आहे.
२०१३ मध्ये मान्सूनचा सर्वात जलद प्रवास
२०१३ मध्ये सर्वात कमी वेळेत म्हणजे केवळ १५ दिवसांतच मान्सून संपूर्ण देशभरात पोहोचला होता. त्यावर्षी अगदी वेळेत १ जून रोजी पावसाचे आगमन केरळमध्ये झाले होते व १६ जून रोजी अखंड भारत मान्सूनने व्यापला होता. तसेच २००४ मध्ये १८ मे रोजी मान्सून केरळमध्ये आला होता. मिमी (सुमारे ९० इंच) इतका २००२ मध्ये गोव्यात २२७७.६ पाऊस पडला होता, तर २०१३ साली सुमारे ९६ इंच इतका पाऊस नोंद झाला होता