

पणजी :राज्यातील धरणांमध्ये सध्या पुरेसा जलसाठा उपलब्ध असल्याने पुढील दीड दोन महिन्यांची गरज सहज भागविता येणार आहे, असे जलस्रोत मंत्री सुभाष शिरोडकर यांनी सांगितले आहे. सुभाष शिरोडकर पाण्याची उन्हाळ्यात पाण्याच्या उपलब्धतेबाबत सध्या चिंता करण्याची गरज नाही, अशी ग्वाहीही शिरोडकर यांनी दिली. गत दोन वर्षांच्या तुलनेत चालू उन्हाळ्यात गोव्याच्या धरणांमधील पाण्याची पातळी "एक टक्का" जास्त आहे, असे सांगून शिरोडकर यांनी असे असले, तरीही नागरिकांनी पाण्याचा वापर काटकसरीने करावा, असे आवाहन केले.
जलस्रोत खात्याच्या थेट धरण पातळी निरीक्षण प्रणालीनुसार, दोन दिवसांपूर्वीच्या नोंदींनुसार सध्या साळावलीत ३७टक्के, तिळारी ३९ टक्के, अंजुणे २१ टक्के, चापोली ४६ टक्के, आमठाणे ४९ टक्के, पंचवाडी ३३ टक्के आणि गवाणे ४७ टक्के एवढी पाण्याची पातळी आहे.
चांदेल परिसरात पाण्याअभावी गृहिणींचे हाल
हरमल : पुढारी वृत्तसेवा चांदेल पाणीपुरवठा योजनेत तीन दिवस कपात करण्यात आल्याने अनेक भागांतील गृहिणींना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागला. पाण्यासाठी भटकंती करावी लागल्याची माहिती स्थानिक गृहिणींनी दिली असून, अशा आपत्कालीन परिस्थितीत किमान अर्धा तास तरी पाणीपुरवठा करून दिलासा द्यावा, अशी मागणी त्यांनी केली आहे. पाणीपुरवठा खात्याने तीन दिवस पाण्याचा तुटवडा राहणार असल्याचे पूर्वसूचना दिली होती
त्यामुळे गृहिणींनी शक्य तितका पाणीसाठा करून ठेवला. मात्र, तो केवळ एक दिवसच पुरेसा ठरल्याने दुसऱ्या दिवसापासून नागरिकांचे हाल सुरू झाले. घरात मोठ्या प्रमाणात पाणी साठवण्यासाठी आवश्यक भांडी आणि जागेची अडचण असल्याने अनेकांना टँकरमधून पाणी विकत घेऊन गरज भागवावी लागल्याचे गृहिणी सीमा नाईक यांनी सांगितले. सरकारकडून २४ तास पाणीपुरवठ्याची आश्वासने दिली जात असली, तरी अशा परिस्थितीत किमान अर्धा तास पुरवठा झाला असता, तरी मोठा दिलासा मिळाला असता, असे त्यांनी नमूद केले.
दरम्यान, मांद्रे मतदारसंघाचे आमदार जीत आरोलकर यांनी या गंभीर परिस्थितीची दखल घेत ३० एमएलडी पाणीप्रकल्प पूर्णत्वास नेण्यासाठी प्रयत्न सुरू ठेवले आहेत. हा प्रकल्प पूर्ण झाल्यानंतर मांद्रे परिसरातील पाणीटंचाई दूर होईल, अशी अपेक्षा आहे. मात्र, सध्याच्या काळात टँकरद्वारे पाणीपुरवठा अत्यंत मर्यादित प्रमाणात होत असल्याने नागरिकांमध्ये नाराजी आहे.