

पणजी :गोव्यात बाल लैंगिक अत्याचार प्रकरणांत जवळपास ३० टक्के पीडित हे मुलगे असल्याची धक्कादायक माहिती राज्याच्या पीडित सहायक विभागाने (व्हीएयू) उघड केली आहे. २०१४ ते २०२६ या १२ वर्षाच्या कालावधीत नोंदवलेल्या ३,९४९ प्रकरणांच्या विश्लेषणातून ही बाब समोर आली आहे.
या अहवालानुसार, एकूण पीडितांपैकी ७०.८ टक्के मुली, तर २९.२ टक्के मुलगे आहेत. सर्वाधिक अत्याचार पीडितांच्या स्वतःच्या घरातच झाल्याचे दिसून आले आहे. ४६.३ टक्के घटना पीडितांच्या निवासस्थानी घडल्या. तसेच रस्ते, गल्ली, उद्याने अशा सार्वजनिक ठिकाणी २४.६ टक्के प्रकरणे नोंदली गेली आहेत.
या विभागाचे समन्वयक एमिडिओ पिन्हो यांनी दिलेल्या माहितीनुसार समाजात मुलगे अत्याचाराचे बळी ठरू शकत नाहीत, अशी चुकीची धारणा असल्याने अनेक प्रकरणे दडपली जातात.
मुलगेही लैंगिक अत्याचाराचे बळी ठरू शकतात, याबाबत जनजागृतीची गरज आहे, असे त्यांनी मत व्यक्त केले. अत्याचार करणाऱ्यांमध्ये व्यक्तींपासून अशिक्षित उच्चशिक्षित व्यावसायिकांपर्यंत सर्वांचा समावेश आहे. अनेक प्रकरणे हॉटेल्स आणि भाड्याच्या खोल्यांमध्येही घडल्याचे निदर्शनास आले आहे
जनजागृती सत्रे घेण्याची आवश्यकता
या विभागाने शाळांमध्ये मुलगे आणि मुलींसाठी संयुक्त जनजागृती सत्रे घेण्याची आवश्यकता अधोरेखित केली असून, मुलांमध्ये परस्पर सन्मान आणि सुरक्षिततेची भावना निर्माण करण्याचे आवाहन केले आहे.