पणजी ; पुढारी वृत्तसेवा : गोव्यात गेल्या काही दिवसांपासून मुसळधार पाऊस सुरूच आहे. राजधानी पणजीसह राज्यातील सर्वच भागात नदी नाल्यांना पूर आलेला आहे. अनेक रस्ते सततच्या पावसामुळे पाण्यात गेले आहेत. वादळी वाऱ्यामुळे घरावर, वीज वाहिण्यावर व रस्त्यावर झाडे कोसळली असून, अग्निशमन दलाची धावपळ होत आहे.
शाळा आणि महाविद्यालयात जाणाऱ्या विद्यार्थ्यांना जोरदार पावसामुळे बराच त्रास होत आहे. हवामान खात्याने आज गोव्यासह महाराष्ट्र, गुजरात, तेलंगण आणि आंध्र प्रदेशच्या किनारपट्टी भागात मुसळधार पाऊस आणि वादळाचा ऑरेंज अलर्ट जारी केला आहे.
पुढील तीन दिवस गोव्यासह हिमाचल प्रदेश, उत्तराखंड, गुजरात, महाराष्ट्र, तेलंगण, कर्नाटक, आंध्र प्रदेश यासह २२ हून अधिक राज्यांमध्ये मुसळधार पावसाची शक्यता हवामान खात्याने व्यक्त केली आहे.
मुसळधार पावसामुळे राज्यांत लाखो रुपयांची हानी झाली असून, आतापर्यंत ३०० च्या आसपास घरावर झाडे पडली आहेत. नद्यांना पूर आल्यामुळे नदीकाठच्या लोकांना सतर्कतेचा आदेश देण्यात आला आहे. सरकारची आपत्कालीन यंत्रणा सज्ज झाली आहे. तिळारी धरण भरल्यानंतर धरणाचे पाणी सोडण्यात आल्याने जवळपासच्या गावाना धोका निर्माण झाला आहे.
हेही वाचा :