

पणजी : पुढारी वृत्तसेवा
जिल्हा पंचायत निवडणूक ही विधानसभेची सेमीफायनल असल्याने ती जिंकण्यासाठी सत्ताधारी आणि विरोधकांनीही कंबर कसली आहे. दोन्ही जि. पं. वर असणारी सत्ता कायम राखण्यासाठी भाजपचे प्रयत्न आहेत.
तर भाजपचे हे मनसुबे उधळून लावण्यासाठी विरोधकांनी जोर लावला आहे. दरम्यान, या निवडणुकीत मुख्यमंत्री, मंत्री, आमदार आणि विरोधी पक्षनेत्याचीही प्रतिष्ठा पणाला लागली आहे. सत्ताधारी भाजपच्या उमेदवारांच्या प्रचारासाठी मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत आणि प्रदेशाध्यक्ष दामू नाईक यांनी संपूर्ण राज्य पिंजून काढले आहे.
त्यासोबतच सर्व मंत्री व आमदार आपल्या विधानसभा क्षेत्रात येणाऱ्या जिल्हा पंचायत मतदारसंघात प्रचारासाठी फिरत होते. दुसरीकडे विरोधकांनीही जि. पं. निवडणूक जिंकण्यासाठी जोरदार प्रयत्न सुरू केले आहेत.
जिल्हा पंचायतीत भाजपला रोखले, तर विधानसभेत सत्तांतर घडू शकते, अशी आशा विरोधकांना वाटते. आम आदमी पक्षाने सर्वात जास्त ४२ उमेदवार उभे केले आहेत. या पक्षाच्या उमेदवारांच्या प्रचारासाठी दिल्लीचे माजी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल आणि गोवा प्रभारी आतिशी मार्लेना यांनी गोव्यात ठाण मांडून प्रचारात सहभाग घेतला होता.
त्यांच्यासोबत प्रदेशाध्यक्ष अॅड. अमित पालेकर आणि आमदार वेन्झी व्हिएगस व क्रुझ सिल्वा यांनीही प्रचारात सहभागी होत उमेदवारांचा उत्साह वाढवला होता.
काँग्रेसने ३६ व गोवा फॉरवर्डने ९ असे एकूण ४५ उमेदवार उभे केलेल्या युतीच्या प्रचारात काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अध्यक्ष अमित पाटकर, विरोधी पक्षनेते युरी आलेमाव, गोवा फॉरवर्डचे अध्यक्ष आमदार विजय सरदेसाई व काँग्रेसच्या आमदारांनी युतीच्या उमेदवारांचा प्रचार केला.
राज्यात घडलेल्या विविध घटनांमुळे नाराज झालेले मतदारांना आकर्षित करण्याचा या युतीच्या प्रयत्नांना किती यश मिळते, हे सोमवारचा निकालच स्पष्ट करणार आहे. आरजी पक्षाने ३० उमेदवार उभे केलेले आहेत. पक्षाचे अध्यक्ष मनोज परब, आमदार वीरेश बोरकर यांनी पदाधिकारी व कार्यकर्त्यांच्या माध्यमातून आपल्या उमेदवारांचा प्रचार केला आहे.