

कोरगाव : पेडणे तालुक्यातील कोरगाव येथील पाळेवाडा परिसरात गेल्या तीन महिन्यांपासून नळाला पाणीपुरवठा होत नसल्याने स्थानिक नागरिकांनी तीव्र नाराजी व्यक्त करत रस्त्यावर उतरून आंदोलनाचा इशारा दिला आहे. 'आम्ही कामावर जावे की रात्रभर पाणी भरत बसावे?' असा प्रश्नही यावेळी उपस्थित केला जात आहे.
कोरगाव गावात एकूण नऊ वाड्यांमध्ये सार्वजनिक बांधकाम खात्यामार्फत पाणीपुरवठा केला जातो. मात्र, पाळेवाडा येथे गेल्या तीन महिन्यांपासून नळाला पाणी येत नसल्याने नागरिकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. यासंदर्भात अनेक वेळा संबंधित अधिकाऱ्यांकडे तक्रार करूनही प्रश्न मार्गी लागलेला नाही, असे स्थानिकांचे म्हणणे आहे.
स्थानिक पंच दिवाकर जाधव यांनी सांगितले की, संबंधित अधिकाऱ्यांना वारंवार कळवूनही या समस्येकडे दुर्लक्ष केले जात आहे. त्यामुळे संतप्त नागरिकांनी सार्वजनिक बांधकाम खात्याला दोन दिवसांची मुदत दिली असून, त्या कालावधीत पाणीपुरवठा सुरळीत न झाल्यास पाळेवाडा येथील महिला, पुरुष आणि युवक-युवती पेडणे येथील सार्वजनिक बांधकाम खात्याच्या कार्यालयावर मोर्चा काढून तेथे धरणे आंदोलन करतील, असा इशारा देण्यात आला.
टँकरद्वारे पाणीपुरवठा तरीही टंचाई
सध्या या वाड्यावर टँकरद्वारे पाणीपुरवठा केला जात असला तरी तो अपुरा ठरत आहे. काही मोजक्याच घरांना पाणी मिळते, तर अनेकांना पाण्याविना राहावे लागते. काही वेळा रात्री उशिरा पाणीपुरवठा केला जातो; मात्र नळातून अत्यल्प पाणी येत असल्याने नागरिकांना रात्रभर जागून पाणी साठवावे लागते. युवक-युवती पेडणे येथील सार्वजनिक बांधकाम खात्याच्या कार्यालयावर मोर्चा काढून तेथे धरणे आंदोलन करतील, असा इशारा देण्यात आला.