

म्हापसा : गोव्यात झालेल्या एसआयआर अंतर्गत हजारो मतदारांची नावे मतदार यादीतून रद्द करून ती वगळण्यात आली आहेत. म्हापसा मतदारसंघातूनही सुमारे ३,८९६ नावे मतदार यादीतून वगळण्यात आली आहेत. निश्चित निवडणुकीची शाश्वती नसली तरी सुमारे १ ते २ महिन्यानंतर होणाऱ्या पालिका निवडणुकीवर संभाव्य परिणाम संबंधी वगळण्यात आलेल्या या नावावर दुहेरी दृष्टिकोनातून शहरातून उलट सुलट प्रतिक्रिया ऐकावयास येत आहेत. अनेकांनी पात्र मतदारांवर यातून अन्याय झाल्याचे स्पष्ट केले.
पालिकेतील सत्ताधारी गटांनी नाव वळल्याने परिणाम होणार नसल्याचे काहींनी स्पष्ट केले आहे, तर विरोधी गटाकडून वगळलेल्या मतदारांमुळे सत्ताधारी गटावर परिणाम होतील, असेही मत व्यक्त केले आहे. एसआयआर पूर्वी म्हापसा मतदार संघात २९,५४२ मतदारांची नोंद करण्यात आली वेध पालिका निवडणुकीचे होती. एसआयआर अंतर्गत मतदार संघातून ३,८९६ नावे वगळण्यात आल्याने आता २५ हजार ६४६ नावे मतदार यादीत नोंद झाली आहेत.
सरासरी २०० मतदारांना प्रत्येक प्रभागातून वगळले आहे, पण उपलब्ध झालेल्या माहितीनुसार काही प्रभागातून सरासरी ५० पासून ते ३०० पर्यंत मतदारांना वगळण्यात आले आहे. प्रत्येक प्रभागात १५०० ते १६०० मतदार होते. आता एसआयआर नंतर सरासरी प्रत्येक प्रभागात १ हजार ३०० मतदारांची संख्या झाली आहे.
सत्ताधाऱ्यांसोबत विरोधी गटही चिंतेत
अनेकांचे निवडणुकीत आधारस्तंभ मानले जाणारे मतदार वगळण्यात आल्याने पालिकेच्या निवडणुकीत एसआयआरचा फटका सत्ताधारी गटासोबत विरोधी गटालाही बसणार आहे. मात्र, एसआयआर दरम्यान ज्यांनी या प्रक्रियेत लक्ष घालून मतदारांना सहकार्य केले त्याला निवडणुकीत नक्कीच लाभ होईल, असे मत माजी नगराध्यक्ष संदीप फळारी यांनी व्यक्त केले आहे.
याद्यानुसार होणार नियोजन
एसआयआरअंतर्गत तयार करण्यात आलेल्या मतदार याद्यांचा वापर होणाऱ्या पालिकेच्या निवडणुकीत होण्याची शक्यता आहे. त्यामुळे प्रत्येक प्रभागातील इच्छुकांना नव्या मतदार यादीनुसार आपले नियोजन करणे भाग पडणार आहे.