

दाबोळी : पुढारी वृत्तसेवा
वास्को शहरात तसेच नवेवाडे वास्को येथे श्री संतोषी माता देवस्थानाच्या शेजारी सध्या कचऱ्याचे ढीग साचले आहेत. या भागात तसेच इतर भागात मोठ्या प्रमाणावर कचरा साचल्याने स्वच्छतेच्या दाव्यालाच तडा गेला आहे.
पालिकेच्या कचरा उचल करण्यात येणारी दुरवस्था इतकी गंभीर झाली आहे की, शहरी भागाबरोबर इतर ठिकाणी प्रवेश करताना नागरिक आणि प्रवाशांना नाक दाबून जावे लागत आहे. नवेवाडे भागात प्रवेश करताच प्रत्येकाचे स्वागत आता स्वच्छते ऐवजी दुर्गंधीयुक्त कचऱ्याने होत आहे.
प्रत्येक परीसरात मुख्य रस्त्याच्या कडेला प्लास्टिक पिशव्या, टाकाऊ वस्तू आणि विविध कचऱ्याचे ढीग साचलेले दिसत आहेत. नगरपालिकेने केवळ शहरातील अंतर्गत स्वच्छतेवर भर न देता, नगरपालिकेने लक्ष देण्याची गरज आहे. शहराच्या इतर परिसरातील कचऱ्याची तातडीने विल्हेवाट लावावी, तसेच या भागाची नियमित स्वच्छता करावी, अशी मागणी स्थानिक नागरिक आणि पर्यावरणप्रेमींमधून होत आहे.
स्थानिक म्हणतात; भाडेकरूंकडून प्रकार
घरात राहणारे भाडोत्री व मागातील काही नागरिकांकडून हा कचरा येथे टाकला जात असल्याचे बोलले जात आहे. मात्र हा भाग नेमका कोणाच्या कार्यक्षेत्रात येतो तसेच कचरा उचलण्याची जबाबदारी कोणाची, याबाबत संभ्रम असल्याने कचऱ्याचे ढीग दिवसेंदिवस वाढत चालले आहेत. परिणामी परिसरात तीव्र दुर्गंधी पसरली असून नागरिकांच्या आरोग्याचाही प्रश्न निर्माण झाला आहे.