

पणजी : पुढारी वृत्तसेवा
गोवा विद्यापीठाच्या शैक्षणिक परिषदेने एलएलबी, बीए एलएलबी आणि बीकॉम एलएलबी अभ्यासक्रमांतील विद्यार्थ्यांना तृतीय वर्षात प्रवेशाचा मार्ग आता मोकळा केला आहे. मात्र, या निर्णयानंतर काँग्रेस आणि भाजपमध्ये श्रेयवादाची लढाई सुरू झाली आहे.
विद्यार्थ्यांच्या न्याय्य मागण्यांसाठी सातत्यपूर्ण पाठपुरावा केल्यानेच हा प्रश्न मार्गी लागला, असे मत गोवा एनएसयूआयतर्फे व्यक्त करण्यात आले, तर विद्यार्थ्यांचे गाऱ्हाणे मुख्यमंत्री दरबारी मांडल्यानेच विद्यार्थ्यांचे वर्ष वाया न जाता त्यांना न्याय मिळाला असा दावा भाजप युवा मोर्चातर्फे करण्यात येत आहे.
विद्यापीठाच्या सुधारित नियमानुसार, सेमिस्टर १ ते ४ मधील परीक्षा पूर्ण केलेल्या आणि एकूण पाचपेक्षा अधिक बॅकलॉग नसलेल्या विद्यार्थ्यांना आता तृतीय वर्षात प्रवेश मिळेल. चौथ्या सेमिस्टरची किंवा खालच्या सेमिस्टरची पुनर्परीक्षा दिलेल्या व निकालाच्या प्रतीक्षेत असलेल्या विद्यार्थ्यांना तात्पुरत्या स्वरूपात वर्गांना उपस्थित राहण्याची परवानगी देण्यात आली आहे.
भाजप प्रवक्ते सिद्धार्थ कुंकळ्येकर म्हणाले की, कायदा विद्यार्थ्यांच्या हितासाठी भाजप युवा मोर्चातर्फे सुरुवातीपासूनच पावले उचलण्यात आली. त्यांनी ही समस्या मुख्यमंत्री डॉक्टर प्रमोद सावंत आणि दामू नाईक यांच्यापुढे मांडल्याने त्यांच्या प्रयत्नांना यश आले आहे.
लोकशाही मार्गाच्या संघर्षाचा विजय : चोडणकर
हा निर्णय लोकशाही मार्गान केलेल्या संघर्षाचा आणि सामूहिक प्रयत्नांचा विजय आहे. विद्यार्थ्यांवर अन्याय होत असताना एनएसयूआय गोवा त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभी राहिली आणि त्यांच्या न्याय्य मागण्या विद्यापीठ प्रशासनापर्यंत प्रभावीपणे पोहोचवल्या, असे काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष गिरीश चोडणकर यांनी म्हटले आहे.