

पणजी : पुढारी वृत्तसेवा
गोवा सरकारला ५५७० कोटीच्या कर वाट्यातून मोठा निधी मिळणार आहे, यंदाचा अर्थसंकल्प विकसित भारताचा संकल्प पूर्ण करणारा आहे. संरक्षणा सोबत आरोग्य खात्यासाठी जादा तरतूद केली आहे. गोव्याला आरोग्य व कृषी विभागासह पर्यटन क्षेत्र व मच्छीमारासाठी मोठ्या प्रमाणात वाटा मिळणार आहे.
त्यामुळे गोवा सरकार व गोव्याच्या जनतेतर्फे पंतप्रधान नरेंद्र मोदी व अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांना धन्यवाद, असे प्रतिपादन मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी केले. सोमवारी पर्वरी मंत्रालयात आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी जलस्रोत खात्याचे मंत्री सुभाष शिरोडकर व वाहतूक मंत्री मावीन गुदिन्हो उपस्थित होते.
मुख्यमंत्र्यांनी सांगितले की, यंदाच्या अर्थ संकल्पात सेमीकंडक्टर सिस्टीमच्या विकासावर भर दिला आहे. त्याचबरोबर कृषी विकास व महिला विकासाच्या माध्यमातून आत्मनिर्भर भारताच्या दिशेने पावले उचलली गेली आहेत. सेवा विभागावर आणि हॉस्पिटॅलिटी विभागावरील भर देण्यात आलेला आहे.
देशाच्या संरक्षणानंतर आरोग्य खात्याला जास्त आर्थिक तरतूद करण्यात आलेली आहे. देशात नव्या मोठ्या तीन आयुर्वेदिक संस्था स्थापन केल्या जाणार आहेत. २०१४ नंतर आयुर्वेद, सिद्धा आणि युनानी उपचार पद्धतीला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी प्राधान्य दिले आहे, असे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी सांगितले.
उत्तर गोव्यात वेळगे येथे व दक्षिण गोव्यात मोती डोंगर-मडगाव येथे बांधकाम सुरू असलेली आयुष इस्पितळे पुढील सहा महिन्यांत तयार होणार असल्याची माहिती डॉ. सावंत यांनी दिली. देशात १ लाख प्रशिक्षित पॅरामेडिकल स्टाफ तयार करण्याचे लक्ष ठेवलेले असून त्याद्वारे गोव्यातील पॅरामेडिकल प्रशिक्षण संस्थाना लाभहोणार असल्याचे सांगून शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढवण्यासाठी खास योजना आखलेली आहे, रोजगार उपलब्ध करतानाच सर्वसामान्यांचा विकासासाठी खास तरतूद करण्यात आली आहे.
किनारी राज्य म्हणून मिळेल वेगळी ओळख
पर्यटन क्षेत्रासाठी हॉटेल व्यवस्थापन कौशल्य प्रशिक्षण योजनेवर भर देण्यात आल्याचे मुख्यमंत्री म्हणाले. स्थानिक वारसा संशोधनावर भर देण्यात आलेला आहे त्याचबरोबर मच्छी उत्पादन वाढविण्यासाठी खास तरतूद केलेली असून त्याचा लाभ गोव्यातील मच्छीमारांना होणार आहे. देशातील सरोवरांच्या नूतनीकरणाचा फायदा गोव्याला असल्याचे सांगून किनारी राज्य म्हणून नारळ व काजू उत्पादनासाठीच्या खास निधीचा लाभ गोव्याला मिळेल, असे मुख्यमंत्री म्हणाले.
खाजन शेतीच्या विकासावर भर
१६ व्या आर्थिक आयोगाच्या निधीचा वाटा गोव्याला मोठ्या प्रमाणात मिळणार असून खाजन शेतीच्या विकासावर सरकार भर देणार आहे. गोवा सरकारला पण ५० वर्षांसाठी बिनव्याजी कर्ज ५०० कोटीपर्यंत घेण्याची मुभा असल्याचे डॉ. सावंत यांनी सांगितले. तसेच मागील वषपिक्षा यावेळी १० टक्के जादा निधी गोव्याला मिळणार असल्याचे मुख्यमंत्री म्हणाले.