

पणजी : पुढारी वृत्तसेवा
धारबांदोडा येथील संजीवनी सहकारी साखर कारखाना बंद झाल्यानंतर, राज्यात उसाची लागवड करणाऱ्या शेतकऱ्यांची संख्या २०२०-२१ मध्ये ६७६ होती ती आता २०२५-२६ मध्ये २९८ पर्यंत घटली आहे. त्यासोबतच एकूण लागवडीखालील क्षेत्र ५४६ हेक्टरवरून २५४.०७हेक्टरपर्यंत कमी झाले आहे. त्यामुळे राज्यातील ऊस लागवड क्षेत्रासह शेतकऱ्यांच्या संख्येतही मोठी घट होत असल्याचे दिसून येत आहे.
कृषी संचालनालयाने दिलेल्या माहितीनुसार, राज्यात २०२१-२२ मध्ये ५८४ शेतकऱ्यांनी ४७३.४४ हेक्टर क्षेत्रावर उसाची लागवड केली होती. २०२२-२३ मध्ये हा आकडा ५७७ शेतकरी आणि ४५४.६६ हेक्टरपर्यंत कमी झाला.
२०२३-२४ मध्ये तो आणखी कमी होऊन ५२६ शेतकरी आणि ४१५.६४ हेक्टरवर आला. सद्यस्थितीत ४९७ शेतकऱ्यांनी ३८१.०४ हेक्टर क्षेत्रावर लागवड केली. राज्यातील संजिवनी साखर कारखाना बंद झाल्यानंतर अनेक शेतकरी भाजीपाला, पामतेल आणि नारळ यांसारख्या पर्यायी पिकांकडे वळले आहेत, असे कृषी संचालनालयाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले.
या कालावधीत, कारखान्याच्या सहकार्याने ऊस उत्पादक शेतकऱ्यांना ४,४९०.०६ लाख रुपयांची आर्थिक मदत देण्यात आली. प्रति मेट्रिक टन ३ हजार रुपये दराने तरतूद करण्यात आली. याअंतर्गत एकूण १,१८३.७३ लाख रुपये वितरित करण्यात आले. २०२१-२२ मध्ये दर २,८०० रुपये प्रति मेट्रिक टन होता, त्यासाठी १,०२८.९१ लाख रुपये दिले गेले.
२०२२-२३ मध्ये, दर २,६०० रुपये प्रति मेट्रिक टन होता आणि ८८६.९२ लाख रुपये वितरित करण्यात आले. २०२३-२४ मध्ये, दर २,४०० रुपये प्रति मेट्रिक टन होता आणि ८८३.१७ लाख रुपये अदा करण्यात आले. २०२४-२५ मध्ये, दर कमी होऊन २,२०० रुपये प्रति मेट्रिक टन झाला आणि ५०७.३३ लाख रुपये वितरित करण्यात आले.