

पणजी : पुढारी वृत्तसेवा
सत्तरी तालुक्यातील ओवलयेन-पिसुर्ले या गावातील ५८ वर्षीय बेशुद्ध महिला रुग्णाचे प्राण वाचवण्यासाठी १०८ रुग्णवाहिका तसेच स्थानिकांनी रस्त्याअभावी तिला स्ट्रेचरवरून सुमारे २ किलोमीटर अंतर पायपीट करत रुग्णवाहिकेपर्यंत नेले.
मात्र, दुर्दैवाने तिचे निधन झाले. हे अंतर चालत जाण्यासाठी लागलेल्या वेळामुळे तिला तत्काळ उपचार न मिळाल्याने तिचा मृत्यू झाला. त्यामुळे या महिलेच्या मृत्यूला जबाबदार कोण, असा प्रश्न उपस्थित होत आहे.
या आजारी महिलेला इस्पितळात नेण्यासाठी १०८ रुग्णवाहिलेला फोन करण्यात आला. रुग्णवाहिका आली; मात्र रुग्णाच्या घरापर्यंत जाण्यासाठी रस्ता नसून पायवाट असल्याने रुग्णवाहिका जाऊ शकली नाही.
रग्णवाहिकेच्या ईएमटी आश्विनी शेटकर व पायलट (चालक) अजित नरोजी हे चालत त्या महिलेच्या घरापर्यंत स्ट्रेचर घेऊन गेले. हे अंतर सुमारे दोन किलोमीटर एवढे होते. ते या महिलेच्या घरी पोहोचले.
कोणताही वेळ न लावता व प्राथमिक उपचार करून या रुग्ण महिला स्ट्रेचरवर घालून पायवाटेने निघाले. या रुग्णवाहिकेच्या कर्मचाऱ्यांनी चांगली कामगिरी केली. त्यांना ग्रामस्थांनीही साथ दिली. रुग्णवाहिकेच्या कर्मचाऱ्यांनी प्रसंग पाहून केलेल्या कामगिरीचा आरोग्यमंत्र्यांनी त्यांचे कौतुक केले.