

पणजी: राज्यातील स्थानिक राजकारणात 'रिव्होल्यूशनरी गोवन्स' पक्ष सध्या गंभीर अंतर्गत संघर्षांचा सामना करत आहे. सुरुवातीपासूनच पक्षाचे अध्यक्ष मनोज परब यांच्या आक्रमक शैलीमुळे पक्षात नाराजी वाढत असल्याचे चित्र आहे. सध्या एकमेव आमदार वीरेश बोरकर आणि मनोज परब यांच्यातून विस्तव जात नसल्याने पक्ष फुटीच्या वाटेवर असल्याची एकंदरीत चिन्हे दिसत आहेत.
वरवर पाहता या वादाची सुरुवात आगशी येथील सेंट लॉरेन्स पंच सदस्य ज्युलियस आल्मेदा यांच्या हकालपट्टीनंतर झाली असे वाटत असले तरी २०२२ च्या विधानसभा निवडणुकीनंतरच अंतर्गत कुरघुडी सुरू झाल्या होत्या. निडणुकीच्या महिनाभर आधीच पक्षाला निवडणूक आयोगाची मान्यता मिळाली आणि अध्यक्षपदी मनोज परब यांच्या नावावर शिक्कामोर्तब झाले. त्यानंतर आपणच सर्वेसर्वा अशी भूमिका घेतलेल्या मनोज परब यांच्या एककल्ली वृत्तीमुळे एक-एक कार्यकर्ता पक्षाकडे पाठ फिरवू लागला. आतापर्यंत १५ हून अधिकांनी पक्ष सोडला असून आहेत त्यांचेही एक पाऊल आधीच बाहेर पडले असल्याचे दिसून येत आहे.
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, २०२२ च्या निवडणुकीत आमदार म्हणून निवडून आल्यानंतरच आपली किंमत कमी होईल आणि वीरेश बोरकर अधिक प्रसिद्ध होतील, अशी भीती परब यांना सतावत होती. त्यातच पणजीत बोरकर यांच्या भव्य टीसीपी कलम ३९ अ आंदोलनानंतर त्यांची जनमानसातील प्रतिमा अधिक उजळून निघाली. प्रभावी नेता म्हणून त्यांच्याकडे सर्वजण पाहू लागले. इथेच मनोज परब यांना असुरक्षित वाटू लागले आणि अंतर्गत घूसफूस वाढू लागली. त्यानंतर पक्ष कार्यकर्त्यांमध्ये देखील बोरकर यांनीच पक्षाचे नेतृत्व करावे, अशी मागणी होऊ लागली.
ज्युलियस आल्मेदा यांनी परब यांच्या एका निकटवर्तीय कार्यकत्यांकडे ही मागणी उघडपणे बोलून दाखवल्यानंतर काहीच कल्पना नसलेल्या बोरकरांवर अध्यक्षांनी आगपाखड केली. त्यानंतर त्यांना पक्षविरोधी कारवाई केल्याबद्दल दोन वेळा कारणे दाखवा नोटीसही बजावली. याच पार्श्वभूमीवर दोघांमधील वाढत्या कलहामुळे आता पक्षात मनोज परब आणि वीरेश बोरकर असे दोन गट झाले असून परस्परविरोधी हालचालींना वेग आल्याचे दिसत आहे. त्याचसोबत इतरवेळी पक्षाचे आमदार, उमेदवार किंवा कार्यकर्त्यांना विश्वासात न घेता महत्त्वाचे निर्णय स्वतःच घेणे, आपण सांगेल तेच झाले पाहिजे, अशी वृत्ती असलेल्या मनोज परब यांच्याबद्दल पक्ष सोडलेल्या कार्यकर्त्यांनीही तीव्र नाराजी व्यक्त केली आहे.
काँग्रेस की भाजप, कुणाला असेल पसंती?
राजकीय वर्तुळात सध्या अशी चर्चा रंगत आहे की, वाढत्या अंतर्गत तणावामुळे आमदार वीरश बोरकर पक्ष सोडण्याचा निर्णय घेऊ शकतात. त्यांच्या काँग्रेस किंवा भाजपमध्ये प्रवेशाच्या चर्चानाही जोर आला आहे. काँग्रेसमध्ये युरी यांच्याशी असलेले त्यांचे चांगले संबंध आणि दुसरीकडे भाजपमध्ये मुख्यमंत्र्यांशी असलेला सलोखा पाहता ते कोणत्या पक्षाला पसंती देणार, याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे. मात्र, याबाबत अधिकृत पुष्टी अद्याप झालेली नाही.
घरचा वाद चव्हाट्यावर!
दोघांमधील अंतर्गत वाद आता पक्षापुरता मर्यादित न राहता सोशल मीडियावर एकमेकांविरोधातील पोस्ट सध्या तुफान व्हायरल होत आहेत. एकंदीत परिस्थितीमुळे लवकरच पक्ष विखुरण्याची चिन्ह दिसत असल्याचे मत राजकीय विश्लेषकांनी व्यक्त केले.