

पणजी : गोव्यात मान्सून उशिरा दाखल होणार असल्याचा अंदाज हवामान वेधशाळेने व्यक्त केला होता. दरम्यान गेल्या काही दिवसांपासून अधुनमधून पडणाऱ्या पावसामुळे लोकांना उष्णतेपासून दिलासा मिळाला आहे. हवेत काही प्रमाणात गारवा असल्याने वातावरण समाधानकारक आहे.
हवामान खात्याने जारी केलेल्या माहितीनुसार, पुढील ३ तासात उत्तर गोव्यातील तिसवाडी, पेडणे, डिचोली व बार्देश तालुक्यांमधील काही तुरळक ठिकाणी मेघगर्जनेसह पाऊस, विजांचा कडकडाट व सोसायट्याच्या वाऱ्यासह हलका ते मध्यम स्वरुपाचा पाऊ पडण्याची दाट शक्यता आहे.
राज्यात उष्णतेचे तामान सरासरी ३५ अंश सेल्सियसवर गेल्याने लोकांना उष्णतेपासून त्रास होत आहे. दुपारच्यावेळी बाहेर जाणेही मुष्कीलीचे बनून राहिले होते. कडाक्याचे ऊन तसेच हवामानातील दमटपणा यामुळे लोकांना कामासाठी बाहेर पडणे कठीण होऊन बसले होते. मात्र तुरळक पडणाऱ्या पावसामुळे लोकांनी उष्णतेपासून सुस्कारा सोडला आहे.
जून महिन्याच्या १० तारखेनंतर मान्सून दाखल होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. राज्यातील विविध भागातील गटारे साफसफाई अजूनही सुरूच आहे. काही ठिकाणी रस्ते खचले आङेत तेथे प्राधान्यक्रमाने कामे सुरू आहेत. वीज खात्याकडून रस्त्याच्या बाजूने असलेल्या विद्युत वाहिन्यांवरील झाडांच्या फांद्या कापण्याचे काम अजूनही सुरू आहेत.