

पणजी : पुढारी वृत्तसेवा
नुकतेच उद्घाटन झालेल्या पर्वरी येथील सहापदरी उड्डाण पुलाबाबतच्या गंभीर अपयशाची वाल्मिकी नाईक जबाबदारी एकमेकांवर ढकलण्याचा भाजपकडून सुरू असलेला प्रयत्न म्हणजे केवळ ब्लेम पासिंगचा खेळ असल्याची टीका करत राज्यातील जनतेचे जीव आणि विकासाच्या अपेक्षा हा भाजपसाठी केवळ एक खेळ आहे काय, असा सवाल आम आदमी पक्षाचे गोवा प्रदेशाध्यक्ष वाल्मिकी नाईक यांनी केला आहे.
नाईक यांनी सांगितले की, उड्डाण पुलाचे काम पूर्ण झाल्यानंतर त्याचे श्रेय घेण्यासाठी भाजपमधील प्रत्येकजण पुढे आला. मुख्यमंत्री स्वतः सोशल मीडिया रील्स बनवत होते. सुपरकार रॅलींचे आयोजन केले. पर्यटन मंत्री रोहन खंवटे यांनी उड्डाण पुलावर बसून मुलाखत दिली. सार्वजनिक बांधकाम मंत्री दिगंबर कामत यांनी या पुलावरून वाहन चालवत असताना मुलाखत दिली. मात्र आता या पुलामध्ये गंभीर डिझाइन त्रुटी असल्याचे स्पष्ट झाल्यानंतर हेच सर्वजण जबाबदारीपासून हात झटकत आहेत.
नाईक म्हणाले की, भाजपला केवळ श्रेय घेण्यात रस होता; मात्र उड्डाण पुलामध्ये स्पष्टपणे दिसणाऱ्या डिझाइन त्रुटींवर त्यांनी मौन बाळगले. या त्रुटींमुळे गोमंतकीयांचे जीव गेले आहेत. तसेच, या पुलाच्या बांधकामादरम्यान पर्वरीमधील नागरिकांना मोठ्या त्रासाला सामोरे जावे लागले; मात्र आता पूल तयार झाल्यानंतरही त्यांना त्याचा योग्यप्रकारे वापर करता येत नाही.
गोवा उपाध्यक्ष सुनील सिग्नापूरकर यांनी पर्वरी उड्डाणपुलाला पूर्णपणे अभियांत्रिकी अपयश असे संबोधत हा उड्डाणपूल सुरुवातीपासूनच कॅसिनोंकडे सहज प्रवेश मिळवून देण्यासाठी डिझाइन करण्यात आला होता का, असा सवाल केला.
मॅन्युअल कार्दोझो यांनी निदर्शनास आणून दिले की, संभाव्य दुर्घटना टाळण्यासाठी आवश्यक असलेले योग्य दिशादर्शक फलक आणि सूचना फलक उभारण्यासाठीही सरकारने पुरेशी गुंतवणूक केलेली नाही. गोमंतकीय जनतेच्या कोट्यवधी रुपयांचा खर्च झालेल्या या गंभीर चुकीसाठी आणि टाळता येण्याजोग्या दुर्घटनांमध्ये गोमंतकीयांचे जीव जाण्यास कारणीभूत ठरलेल्या परिस्थितीसाठी सरकार जबाबदार आहे.