

पणजी : पुढारी वृत्तसेवा
जानेवारी २०२४ पासून ते आतापर्यंत परदेशातील भरतीसंबंधी फसवणूक प्रकरणांत गोवा पोलिसांनी एकूण १८ गुन्हे नोंदवले आहेत. यापैकी १० संशयितांना अटक करण्यात आली असून ८ प्रकरणांत आरोपपत्र दाखल करण्यात आले असल्याची माहिती पोलिस क्राईम ब्रँचचे अधीक्षक राहुल गुप्ता यांनी दिली.
जानेवारी २०२६ मध्ये गोवा पोलिसांच्या गुन्हे शाखेने राज्यभर सविस्तर चौकशी राबवली त्यात गोव्यात कार्यरत असलेल्या भरती (रिक्रूटेमेंट) एजन्सींच्या कामकाजाची तपासणी करण्यात आली. १ जानेवारी २०२४ पासून आतापर्यंतच्या कालावधीत आग्नेय आशियाई देशांमध्ये (साऊथ ईस्ट एशिया) परदेशी रोजगारासाठी होणाऱ्या भरतीवर लक्ष केंद्रित करण्यात आले.
संबंधित सर्व उपविभागांतील बीट अधिकाऱ्यांमार्फत ही चौकशी करण्यात आली. यामध्ये कार्यालयांची प्रत्यक्ष तपासणी, स्थानिक सूत्रांशी संवाद, तसेच भरतीच्या स्वरूपाचा अभ्यास करण्यात आल्याचे त्यांनी सांगितले.
या चौकशीत असे आढळून आले की, सध्या गोव्यात कार्यरत असलेल्या नोंदणीकृत व ओळखीत असलेल्या भरती एजन्सी आग्नेय आशियाई देशांसाठी उमेदवारांची भरती करत नाहीत. त्यांच्या कामकाजाचा तपशील आणि भरती प्रोफाईलची पडताळणी करून नोंद ठेवण्यात आली आहे. ही चौकशी गोव्यातील नागरिकांना या देशांमध्ये 'सायबर गुलामगिरी' सारख्या शोषणापासून वाचविण्याच्या प्रतिबंधात्मक उद्देशाने करण्यात आली आहे.
या चौकशीदरम्यान संशयित बेकायदेशीर भरती एजन्सी व व्यक्तींचीही तपासणी करण्यात आली. बहुतांश प्रकरणांत दिलेले पत्ते चुकीचे किंवा अस्तित्वात नसलेले आढळले, कार्यालये बंद होती किंवा त्या ठिकाणी कोणतीही भरती प्रक्रिया सुरू नसल्याचे दिसून आले.
तसेच अनेक संपर्क क्रमांक बंद, अनुपलब्ध किंवा भरतीशी असंबंधित असल्याचे निष्पन्न झाले. काही व्यक्तींनी सध्या आपण परदेशी भरती व्यवसायात कार्यरत नसल्याचे स्पष्ट केले. परदेशी रोजगाराचा विषय संवेदनशील असून शोषणाचा धोका लक्षात घेता, संशयास्पद भरती कारवायांवर सतत लक्ष ठेवण्याचे आणि गुप्त माहिती संकलन सुरू ठेवण्याचे निर्देश बीट कर्मचाऱ्यांना देण्यात आले आहेत.
परदेशी नोकरीबाबत सावधान !
बोगस भरती फसवणुकीत सहभागी असलेल्या कोणत्याही व्यक्ती किंवा एजन्सीविरोधात त्वरित कायदेशीर कारवाई करण्यासाठी गोवा पोलिस कटिबद्ध असून, नागरिकांनी परदेशी रोजगारासाठी कोणत्याही भरती एजन्टांशी संपर्क साधण्यापूर्वी अधिकृत सरकारी व्यासपीठावरून त्यांची खात्री करून घ्यावी, असे आवाहन अधीक्षक राहुल गुप्ता यांनी केले आहे.