

पणजी : पुढारी वृत्तसेवा
राज्यात मान्सूनचे आगमन होऊन १५ दिवस उलटले. मात्र, पाऊस गायब झाल्याने चिंता वाढली आहे. रविवारी राज्यात काही ठिकाणी दमट हवामान होते, तर काही ठिकाणी कडक ऊन पडले होते. आकाशात ढग दाटून आले होते. मात्र, ते बरसलेच नाहीत.
गोवा दोडामार्ग, लाडफे परिसरात आणि सत्तरीसह आजूबाजूच्या परिसरातील काही भागांत पावसाचा शिडकावा झाला. पणजीतही सकाळी हलकासा पाऊस पडला. दरम्यान, हवामान खात्याने सोमवारी (२२ जून) आणि मंगळवारी (२३ जून) पावसाचा यलो अलर्ट जारी केला आहे.
पाऊस नसल्याने शेतकऱ्यांसाठी चिंता करण्यासारखी स्थिती आहे. पाऊस पडावा म्हणून साखळी येथे भाजप किसान मोर्चाच्या सदस्यांनी देवाकडे गाऱ्हाणे घातले. आतापर्यंत राज्यात केवळ १६७.५ मि.मी. (६.५९ इंच) पावसाची नोंद झाली आहे. मागच्या वर्षीच्या तुलनेत आजपर्यंत पावसाची ७२ टक्के तूट नोंदवण्यात आली आहे.