काणकोण : खोतीगाव पंचायत क्षेत्रातील केरीगाव-खोतीगाव अभयारण्य कक्षेत येत असल्याने या भागात रस्ता करण्यासाठी अभयारण्याचे कायदे आड येतात, अशा केरीगावातील नागरिकांच्या तक्रारी आहेत. त्यामुळे रस्ता नसल्याने गावात पायी चालत जाण्याची वेळ ग्रामस्थांवर येते, अशी माहिती खोतीगावचे माजी सरपंच दया गावकर यांनी दिली. तसेच अभयारण्याचे नियम शिथिल करून या भागात जाण्यासाठी सरकारने रस्ता करावा, अशी मागणी गावकर यांनी केली आहे.
गोवा मुक्त होऊन ६३ वर्षे पूर्ण होण्याच्या मार्गावर आहेत. तरी या गावात वीज पुरवठा करण्यास वीज खात्याला यश आले नाही. या गावात १२ घरे असून जवळपास ५० लोकसंख्या आहे. या गावात जाण्यासाठी नडके गाव काढल्यावर एक ओहोळ लागतो. पावसाळ्यात हा ओहोळ पार करणे शक्य होत नाही. त्यासाठी गावचे लोक एकत्र येऊन प्रत्येकवर्षी लाकडी पूल तयार करतात, अशी माहिती येडा-खोतीगाव येथील शाबू गावकर यांनी दिली.
केरी गावात प्राथमिक शाळा नसल्याने शिक्षण घेण्यासाठी या भागातील मुलांना येडा येथे यावे लागते. केरी-येडा पायी प्रवास दोन तासांचा असल्याने या भागातील मुले शिक्षण घेण्यासाठी येडा येथे नातेवाईकांच्या घरी राहणे पसंद करतात.
गावात कुठल्याही प्रकारच्या आरोग्य सुविधा उपलब्ध नाहीत. या गावातील नागरिकांना प्राथमिक सुविधा उपलब्ध करून देण्याची नागरिकांची मागणी आहे. लोकप्रतिनिधी फक्त निवडणूक काळात या गावात येतात, असा आरोप नागरिकांनी केला आहे.
काणकोण सामाजिक आरोग्य केंद्रातील डॉक्टरांनी तसेच परिचारिकांनी गेल्या पंधरवड्यात केरी गावात जाऊन रुग्णांची तपासणी केली असल्याची माहिती काणकोण सामाजिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉ. जुझे तावारीस यांनी दिली.