म्हापसा, पुढारी वृत्तसेवा : मुंबईमधून गोव्याला फिरण्यासाठी आलेल्या जेष्ठ दांपत्याचा शुक्रवारी (दि.19) समुद्रात बुडून दुर्देवी अंत झाला आहे. माटुंगा येथून गोव्यात पर्यटनासाठी आलेल्या प्रदीप दोशी (वय.73) आणि हर्षदा दोशी (वय.70) ह्या जोडप्याचा सिकेरी-कांदोळी येथील समुद्रात बुडून मृत्यू झाला. या घटनेतील बुडालेल्या आणखी एका महिलेला सुरक्षा रक्षकांना वाचविण्यात यश आले असून तिच्यावर गोमेकॉत उपचार सुरू आहेत. ही घटना शुक्रवारी सकाळी 11 वाजता घडली.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मुंबईतील सात जोडप्यांचा गट गोव्यामध्ये पर्यटनासाठी आला होता. पावसाचा रेड अलर्ट असताना सुद्धा ते कांदोळी किनार्यावर फिरण्यासाठी गेले. या दरम्यान समुद्राच्या लाटांचा अंदाज न आल्यामुळे प्रदीप दोशी, हर्षदा दोशी व कल्पना पारेख हे पाण्यात ओढले गेले. किनार्यावर तैनात असलेल्या पर्यटक पोलिस आणि जीवरक्षकांच्या निदर्शनास येतात त्यांनी त्वरित तिघांनाही बाहेर काढून कांदोळी आरोग्य केंद्रात दाखल केले. यावेळी प्रदीप दोशी आणि हर्षदा दोशी यांना डॉक्टरांनी मृत घोषित केले, तर कल्पना पारेख यांच्यावर सध्या रुग्णालयात उपचार सुरु आहेत.