

पणजी : पुढारी वृत्तसेवा
गोव्यातील बेकायदा बोअरवेल्सविरोधातील कारवाई येत्या ऑगस्ट महिन्यापासून सुरू करण्यात येणार असल्याची माहिती जलस्रोत मंत्री सुभाष शिरोडकर यांनी दिली. राज्यभरातील बेकायदा बोअरवेल्सची तपासणी पूर्ण झाल्यानंतर टप्प्याटप्प्याने कारवाई करण्यात येईल, असे त्यांनी स्पष्ट केले.
मंत्री शिरोडकर म्हणाले की, सध्या राज्यात पाणीटंचाईची कोणतीही परिस्थिती नाही. साळावली, अंजुणे आणि इतर प्रमुख धरणांमधील जलसाठ्यात समाधानकारक वाढ झाली. असून पिण्याच्या पाण्याचा पुरवठा सुरळीत सुरू आहे. त्यामुळे नागरिकांनी पाणीटंचाईबाबत चिंता करण्याचे कारण नाही.
भविष्यात उन्हाळ्यात पाणीटंचाई निर्माण होऊ नये, यासाठी सरकार विशेष नियोजन करीत आहे. त्यानुसार मे महिन्यापासूनच अतिरिक्त धरणांमध्ये पाणीसाठा राखून ठेवण्याची व्यवस्था करण्यात येणार आहे.
पावसाचे आगमन उशिरा झाले तरी पुढील तीन महिन्यांसाठी राज्यात पुरेसा पाणीसाठा उपलब्ध राहील, यासाठी आवश्यक उपाययोजना केल्या जातील. या नियोजनामुळे भविष्यातील पाणीटंचाई टाळण्यास मदत होईल, असा विश्वास मंत्री सुभाष शिरोडकर यांनी व्यक्त केला.