

पणजी : पुढारी वृत्तसेवा
गोव्यात सायबर गुन्ह्यांचे प्रमाण झपाट्याने वाढत असून, २०२६ च्या पहिल्या चार महिन्यांतच १,५०० हून अधिक सायबर फसवणुकीच्या तक्रारी दाखल झाल्या आहेत. डिजिटल अटक, बनावट गुंतवणूक योजना आणि नोकरीच्या आमिषाने होणाऱ्या फसवणुकींमुळे नागरिकांचे कोट्यवधी रुपयांचे नुकसान होत असल्याचे समोर आले आहे.
अधिकृत आकडेवारीनुसार, २०२३ मध्ये सायबर गुन्ह्यांची ८२ प्रकरणे नोंदली गेली होती. २०२४ मध्ये ती वाढून ८५ वर पोहोचली, तर २०२५ मध्ये आतापर्यंत १३१ प्रकरणांची नोंद झाली आहे. सायबर फसवणुकीतील 'डिजिटल अटक' प्रकारात एका व्यक्तीची तब्बल ६१.८४ लाख रुपयांची फसवणूक झाली.
दुसऱ्या एका प्रकरणात ६० लाख रुपये गमावल्याची नोंद आहे. मागील सात महिन्यांत बनावट गुंतवणूक योजनांमुळे ५०० कोटी रुपयांहून अधिक रकमेची फसवणूक झाल्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे.
एकूण नुकसान ८०० ते १,००० कोटी रुपयांच्या दरम्यान असण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. सायबर गुन्हे रोखण्यासाठी पोलिस आणि तपास यंत्रणांनी संकेतस्थळांच्या लिंक, १६८ सोशल मीडिया खाती आणि ८६६ मोबाईल क्रमांक ब्लॉक केले आहेत. फेब्रुवारी २०२६ पासून १११ ई-झिरो एफआयआर नोंदवण्यात आले आहेत.
सायबर तज्ज्ञांच्या मते, आर्थिक व्यवहारांचे वाढते डिजिटायझेशन आणि ऑनलाइन फसवणूक करणाऱ्यांच्या अत्याधुनिक पद्धतींमुळे नागरिक मोठ्या प्रमाणात जाळ्यात अडकत आहेत. गुंतवणूक करताना काळजी घेण्याचे आणि संशयास्पद कॉल, संदेश किंवा लिंकपासून सावध राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे. दरम्यान, सायबर फसवणुकीचे लक्ष्य झाल्यास त्वरित राष्ट्रीय सायबर गुन्हे नोंद पोर्टल किंवा १९३० हेल्पलाइनवर तक्रार करण्याचे आवाहन