

पणजी : पुढारी वृत्तसेवा
राज्य सरकारने आश्वासन दिल्यानुसार माझे घर योजनेअंतर्गत राज्यातील ३ हजार लोकांच्या सनदा तयार झाल्या आहेत. यातील पहिल्या टप्प्यात गुरुवार दि. ४ रोजी मडगाव येथील रवींद्र भवनमध्ये दक्षिण गोवा जिल्ह्यातील १ हजार लोकांना सनदा वितरित करण्यात येणार आहेत, अशी माहिती मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी दिली.
बुधवारी मंत्रिमंडळ बैठकीनंतर पर्वरी येथील मंत्रालयात आयोजित पत्रकार परिषदेत मुख्यमंत्री बोलत होते. ते म्हणाले, कोमुनिदाद, सरकारी, २० कलमी जागेतील आणि गृहनिर्माण जागेतील जुनी घरे कायदेशीर करण्यासाठी माझे घर योजना जाहीर करण्यात आली होती. त्यानुसार गेले सहा महिने प्रक्रिया सुरू होती.
आतापर्यंत सर्व योग्य ती कागदपत्रे लावलेले ३ हजार अर्ज मंजूर झाले असून त्या सनदा तयार करण्यात आल्या डॉ. प्रमोद सावंत आहेत. त्यातील दक्षिण गोव्यातील १ हजार सनदांचे वितरण मडगाव येथे सकाळी ११ वाजता होणार आहे. उत्तर गोव्यातील सनदांचे वितरण बुधवारी १० जून रोजी पणजी येथे होणार असल्याचे मुख्यमंत्र्यानी सांगितले.
मुख्यमंत्री म्हणाले, ज्या लोकांचे अर्ज अजूनही प्रलंबित आहेत, ज्यांच्या अर्जात त्रुटी आहेत, अशा दक्षिण गोव्यातील लोकांनी गुरुवारी रवींद्र भवनमध्ये उपस्थित राहून तेथे स्थापन केलेल्या विविध काऊंटरवर आपले अर्ज पूर्ण करून घ्यावेत, असे आवाहनही यावेळी मुख्यमंत्र्यांनी केले. ज्या कोमुनिदादनी ना हरकत दाखले दिले नाहीत, त्यांना एक महिन्याची मुदत असून त्यानंतर प्रशासक ना हरकत दाखले देणार आहेत.
कोमुनिदादनी ना हरकत दाखले देऊन महसूल मिळवावा, असे आवाहनही डॉ. सावंत यांनी केले. मुख्यमंत्री म्हणाले, १९८० पूर्वीची गृहनिर्माण वसाहतीमधील व १९९२ पूर्वीची राज्यातील जुनी घरे या योजनेअंतर्गत कायम केली जात असून ९५ टक्के घरे ही गोमंतकीयांची कायदेशीर होत असल्याचे मुख्यमंत्र्यांनी एका प्रश्नावर बोलताना सांगितले. आपले सरकार परप्रांतीयांना सरकारी जागा देत नाही आणि देणारही नाही, असे सांगून दिलेल्या आश्वासनानुसार सर्व लोकांना या योजनेचा लाभ मिळेल, असे मुख्यमंत्री म्हणाले.
नोकरभरती आयोगामार्फतच...
सरकारी नोकर भरती ही गोवा कर्मचारी भरती आयोगाद्वारेच होणार आहे. आतापर्यंत २ हजार ५०० जणांना या आयोगाच्या माध्यमातून सरकारी नोकऱ्या देण्यात आल्या आहेत. यापुढेही दिल्या जातील, असे उत्तर मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी दिले.
प्रीमिक्सद्वारे खड्डे बुजवणार
राज्यातील रस्ते हॉटमिक्सिंग पद्धतीने मोठ्या प्रमाणात केले गेले आहेत. मात्र, आणखी डांबर उपलब्ध होत नसल्यामुळे आता उर्वरित रस्त्यावरील खड्डे प्रीमिक्स पद्धतीने भरले जातील, अशी माहिती मुख्यमंत्र्यांनी दिली.