

डिचोली : पुढारी वृत्तसेवा
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली गेल्या बारा वर्षांत भारताने विकासाच्या विविध क्षेत्रांत उल्लेखनीय प्रगती साधली असून देशाला वैभवाच्या शिखरावर नेण्याचे कार्य झाले आहे. केंद्र व राज्य सरकारच्या कल्याणकारी योजनांमुळे सामान्य नागरिकांचे जीवनमान उंचावले असून विकासाचा लाभ प्रत्येक घरापर्यंत पोहोचला आहे.
या योजनांचा लाभ सर्व नागरिकांपर्यंत पोहोचविण्यासाठी लोकप्रतिनिधी, पंचायत सदस्य आणि कार्यकर्त्यांनी पुढाकार घ्यावा, असे आवाहन मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी साखळी येथे केले. 'स्वयंपूर्ण गोवा' अभियानांतर्गत रवींद्र भवन येथे आयोजित जनकल्याण शिबिराच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते.
विविध क्षेत्रांतील १२ मान्यवरांचा सत्कार करण्यात आला. तसेच 'म्हजे घर योजना' आणि 'किसान क्रेडिट कार्ड (केसीसी)' यांसाठी स्वतंत्र सहाय्यता केंद्रांची उभारणी करण्यात आली होती. कार्यक्रमास उपजिल्हाधिकारी, विविध पंचायतांचे सरपंच, वरिष्ठ अधिकारी आणि मोठ्या संख्येने नागरिक उपस्थित होते.
मुख्यमंत्र्यांनी राज्य सरकारच्या विविध विकासात्मक आणि कल्याणकारी उपक्रमांचा आढावा घेतला. स्थानिक महिलांना शाश्वत रोजगार उपलब्ध करून देतानाच गोव्याच्या आदिवासी सांस्कृतिक वारशाचे संवर्धन करण्याचे महत्त्वपूर्ण कार्य या उपक्रमातून साध्य झाले आहे.
राज्याच्या विकासात महिला सक्षमीकरण हा केंद्रबिंदू असून त्यादृष्टीने सरकार सातत्याने कार्यरत असल्याचे मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले. प्रत्येक नागरिकाला सामाजिक सुरक्षा लाभावी यासाठी केंद्र सरकारने विविध विमा योजना सुरू केल्या आहेत. त्याचा लाभ घ्यावा, असे आवाहन त्यांनी केले.