

पणजी : राज्यात वाचन संस्कृती वाढावी व जास्तीत जास्त लोकांना पुस्तकी ज्ञान प्राप्त व्हावे, यासाठी राज्य सरकारने वाचनालय धोरण जाहीर केले आहे. या नव्या धोरणानुसार आता पंचायत तिथे वाचनालय सुरू करण्यात येणार आहे.
उर्वरीत झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीनंतर आयोजित करण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी ही माहिती दिली. ते म्हणाले, सावंत म्हणाले की, राज्यातील शाळा, विविध संस्थांची वाचनालये, पंचायत वाचनालये, तालुका वाचनालये, जिल्हा वाचनालये विकसित करून त्यामध्ये जास्तीत जास्त पुस्तके उपलब्ध केली जातील.
स्पर्धा परीक्षेसाठीची पुस्तके उपलब्ध करण्यावर भर दिला जाईल. राज्यात १९ ई लायब्ररी करण्याचे काम सुरू असून त्यातील १२ तयार झाली आहेत. राज्यात फिरती वाचनालयेही सुरु केली जातील, असेही ते म्हणाले.
ते म्हणाले, खाण अवलंबित ट्रक व बार्ज मालकांना सरकारतर्फे देण्यात येणाऱ्या सुविधा आणि कर माफी २०२७ पर्यंत देण्यास मंत्रिमंडळाने मान्यता दिली आहे. सौरऊर्जा खात्यामध्ये चौघांना सामावून घेण्यास मान्यता देण्यात आली. तात्पुरता दर्जा दिलेल्या ज्या कर्मचाऱ्यांची सेवा सात वर्षे पूर्ण झालेली आहेत, त्यांना सेवेत कायम करण्यासाठी नियमात सुधारणा करण्यात आली आहे. वाहनासाठी वन टाईम टॅक्स नोंदणी वेळेस घेण्यासही मान्यता देण्यात आल्याचे मुख्यमंत्र्यांनी सांगितले.