

पणजी : पुढारी वृत्तसेवा
गोवा माध्यमिक आणि उच्च माध्यमिक बोर्डाला ५० वर्षे हा सुवर्णकाळ पूर्ण झाला असून पुढील ५० वर्षांसाठीचा भक्कम पाया त्यांनी आता रोवला आहे. शिक्षक आणि बोर्डाच्या हातीच पुढे येणाऱ्या जेन झी, अल्फाचे भवितव्य अवलंबून आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांमधील सुप्त गुणांना ओळखून त्यांना चालना दिल्यास येणाऱ्या काळात गोव्यात विद्वान तयार होतील, असे प्रतिपादन मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी केले.
गोवा माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या स्थापनेला ५० वर्षे पूर्ण झाल्यानिमित्त सुवर्णमहोत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. याच वेळी मंडळाच्या नवीन प्रशासकीय इमारतीचे उद्घाटन मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्या हस्ते पार पडले.
या कार्यक्रमास माहिती आणि तंत्रज्ञान मंत्री रोहन खंवटे, बोर्डाचे सदस्य आणि वास्कोचे आमदार कृष्णा साळकर, शिक्षण संचालक शैलेश झिंगडे, बोर्डाचे अध्यक्ष भगीरथ शेट्ये, सचिव विद्यादत्त नाईक तसेच शिक्षण क्षेत्रातील मान्यवर, शिक्षणतज्ज्ञ शिक्षक, अधिकारी व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत म्हणाले की, शिक्षण विभाग आणि गोवा बोर्ड संयुक्तपणे उत्तम कार्य करत असून त्यामुळे राज्यातील शिक्षण प्रणाली अधिक सक्षम होत आहे. राज्यातील शिक्षणाची गुणवत्ता वाढवण्यासाठी शासन सातत्याने प्रयत्नशील आहे. विद्यार्थ्यांमधील सुप्त गुण ओळखण्याची जबाबदारी शिक्षक व शिक्षणतज्ज्ञांवर आहे.
विद्यार्थ्यांच्या कौशल्यांचा योग्य वेळी विकास झाला, तर ते देशाचे उज्ज्वल भविष्य घडवू शकतात. भविष्यातील पिढी घडवण्याची ताकद शिक्षकांच्या हातात आहे. येणाऱ्या पिढ्यांसाठी भक्कम शैक्षणिक पाया घालणे अत्यंत आवश्यक आहे. गोवा बोर्डाचे ध्येय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या 'विकसित भारत' या संकल्पनेला बळकटी देणारे असल्याचा मला विश्वास आहे, असेही मुख्यमंत्र्यांनी नमूद केले.
शिक्षणाचा पाया भक्कम : मंत्री खंवटे बोर्डाचा ५० वर्षांचा यशस्वी रित्या गाठलेला टप्पा हा मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांची नेतृत्वाखाली शिक्षण क्षेत्रातील महत्त्वाचा पुढाकार आहे. गोवा बोर्डातर्फे ज्या गतीने आणि पद्धतीने काम सुरू आहे, ते पाहता विद्यार्थ्यांचे भवितव्य उज्ज्वलच आहे, यात वाद नाही. आताचे शिक्षकही केवळ ९ ते ५ या वेळेपुरते काम न करता याव्यतिरिक्तही सर्व जबाबदाऱ्या नेटाने पार पाडत आहेत, असे प्रतिपादन माहिती आणि तंत्रज्ञान मंत्री रोहन खंवटे यांनी व्यक्त केले.
शाळाबाह्य परीक्षा प्रक्रिया सोपी करा...
अनेकांना आठवीनंतर शाळा सोडावी लागली. मात्र अशांना दहावीची परीक्षा देण्यासाठी इतर राज्यात जावे लागते. त्यांना सुमारे २५ ते ३० हजार मोजावे लागतात. ही प्रक्रिया बोर्डातर्फे सोपी करण्यात यावी, जेणेकरून गोव्यातील कोणीही दहावी पास सहजरित्या होऊ शकेल. याशिवाय ज्यांनी आठवी आणि दहावीनंतर दोन वर्षांचा आयटीआय कोर्स पूर्ण केला असेल त्यांना दहावी आणि बारावीचे प्रमाणपत्र देखील देण्यात येईल, असे मुख्यमंत्री प्रमुख सावंत यांनी सांगितले.