

पणजी : पुढारी वृत्तसेवा
राज्यातील लोकांना गोमेकॉ इस्पितळात चांगल्या प्रकारची आरोग्य सेवा मिळत असल्याचा दावा सरकारकडून केला जात असतानाच या इस्पितळाच्या अखत्यारित असलेले बांबोळी मनोरुग्ण इस्पितळातील (आयपीएचबी) स्थिती व अवस्था केविळवाणी आहे. तेथे सोयीसुविधांचा अभाव आहे. या इस्पितळात बाह्यरुग्ण विभागात (ओपीडी) येणाऱ्या रुग्णांसाठी फक्त दोनच मोडक्या व्हिलचेअर असून त्या धोकादायक आहेत.
व्हिलचेअरसाठीचा प्रस्ताव देऊन वर्ष उलटले तरी अजून त्याचा थांगपत्ता नाही. बांबोळी येथे असलेल्या आयपीएचबी हे इस्पितळ गोमेकॉ इस्पितळाच्या अखत्यारित येत असले तरी तेथील इस्पितळात आरोग्यमंत्री विश्वजित राणे यांनी तेथील परिस्थिती जाणून घेतली नाही तसेच तिवारी यांनी डीन पदाचा ताबा घेतल्यानंतर तेथील असलेल्या त्रुटी तसेच सोयीसुविधांची माहिती घेतली नाही. या बाह्यरुग्ण विभागात या बाह्यरुग्ण (ओपीडी) प्रतिदिन सुमारे १०० हून अधिक मनोरुग्ण उपचारासाठी तसेच औषधोपचारासाठी येत असतात.
त्यामध्ये वयोवृद्ध तसेच दिव्यांगाचाही समावेश असतो. या ठिकाणी फक्त दोनच व्हिलचेअर आहेत. या दोन्ही व्हिलचेअर खूप जुन्या आहेत व त्याची चाकेही चालत नाहीत त्यामुळे त्यावरून रुग्णाला बसवून नेणेही धोकादायक बनले आहे. या दोन्ही व्हिलचेअरवर रुग्ण बसलेले असतील तर तिसऱ्या रुग्णाला व्हिलचेअर नसल्याने अनेकदा त्या रुग्णाला गाडीमध्ये बसवून ठेवावे लागते.
जोपर्यंत व्हिलचेअर रिकामी होत नाही तोपर्यंत रुग्णाला वाट पाहावी लागते. यासंदर्भात मनोरुग्ण इस्पितळातील (आयपीएचबी) काही परिचारिकांशी चर्चा केली असता व्हिलचेअरसाठीची खूपच समस्या आहे. नवीन व्हिलचेअरसाठी प्रस्ताव पाठवून वर्ष उलटले तरी त्याची कार्यवाही झालेली नाही. ज्या व्हिलचेअर आहेत त्या जुन्या आहेत व त्यावरून रुग्णांना बसवून त्या ओढल नेण्याची पाळी येते. त्या व्हिलचेअरची चाकेही फिरत नाहीत. त्याच स्थिती रुग्णांच्या नातेवाईकांना व्हिलचेअरची कसरत करत काम निभावून नेण्याची पाळी येते.
या या मनोरुग्ण इस्पितळात कनिष्ठ डॉक्टरांची उपस्थिती असली तरी वरिष्ठ अधिकाऱ्यांचा अभाव आहे. या इस्पितळात येणारे बहुतेक रुग्ण हे गरीबीतील असतात. त्यांना डॉक्टरांकडून जी औषधे दिली जातात त्यातील कॅल्शियमच्या गोळ्या इस्पितलाच्या फार्मसीमध्ये मिळतात मात्र जी महत्वाची औषधे असतात ती मात्र खासगी फार्मसीमधून विकत घ्यावी लागतात. या इस्पितळाकडेही गोमेकॉ इस्पितळाप्रमाणे आरोग्यमंत्र्यांनी लक्ष देण्याची गरज असे मत काही रुग्णांच्या नातेवाईकांनी या प्रतिनिधीशी बोलताना व्यक्त केली.