

आडपई : आडपई-रासई जलमार्गावर प्रवाशांची वाहतूक करणारी फेरीबोट रासईहून सायंकाळी ६.४० वाजता प्रवासी घेऊन निघाली. मात्र, ही फेरीबोट खाडीच्या मध्यावर बंद पडल्याने तब्बल दोन तास प्रवाशांचा जीव टांगणीला लागला होता.
रासई येथून सायं. ६.४० वाजता फेरीबोटीने प्रस्थान केले. फेरीबोट खाडीच्या मध्यावर पोहोचल्यानंतर अचानक बंद पडली. कॅप्टन नवनाथ नाईक यांनी प्रसंगावधान राखून नांगर टाकून फेरीबोट थांबवण्याचा प्रयत्न केला. इंजिन रूममध्ये जाऊन फेरीबोट सुरू करण्याचा प्रयत्न केला. मात्र, फेरीबोट सुरू झाली नाही. त्यानंतर त्यांनी दुसऱ्या फेरीबोट कर्मचाऱ्यांशी मदतीसाठी संपर्क साधला. मात्र, काहीही उपयोग झाला नाही.
मार्गावरील या प्रकारामुळे घाबरलेल्या प्रवाशांनी आरडाओरड करून रासई-दुर्भाट फेरीबोटवाल्याकडे मदतीसाठी हाका मारल्या. त्या फेरीबोटीने या फेरीला बांधून फेरीबोटोला रात्री ८.२० वाजता धक्क्याला आणून सोडले आणि प्रवाशांनी सुटकेचा निःश्वास सोडला, फेरीतील कर्मचाऱ्यांनी घटनेची माहिती सुपरवायझर संदीप पागी यांच्याशी संपर्क साधत कल्पना दिली. चार दिवसांपूर्वी फेरीबोट दुरुस्त केली होती. दोन दिवसांत दुसऱ्यांदा ही फेरी बंद पडली. फेरीची ऑयल लिकेज झाल्याने ते खाडीच्या पाण्यात गेले. ऑईल संपल्यामुळे फेरीबोट बंद पडली, असे फेरीवरील मॅकॅनिकने सांगितले.