

पणजी : पुढारी वृत्तसेवा
अग्निशमन राज्यातील व आपत्कालीन सेवा संचालनालयास गेल्या १५ दिवसांत राज्यभरातून एकूण २४८ आपत्कालीन कॉल्स प्राप्त झाले. यामध्ये १६ आग लागण्याच्या घटना व ५ आपत्कालीन मदत घटनांचा समावेश असलेल्या एकूण २१ प्रमुख आपत्कालीन घटना नोंदवण्यात आल्या.
या घटनांमध्ये २ गंभीर व १ मोठी घटना होती. सुदैवाने या घटनांमध्ये कोणतीही जीवितहानी झाली नाही. मात्र, सुमारे १०.६२ लाख रुपयांचे आर्थिक नुकसान झाले असून, तत्पर अग्निशमन कारवाईमुळे अंदाजे २१ लाख रुपयांची मालमत्ता वाचवण्यात यश आले आहे. शिवाय, विविध अपघातांमध्ये ५ जनावरांचा मृत्यू झाला असून, ४४ जणांचे प्राण वाचवण्यात अग्निशमन दलाला यश आले आहे.
दरम्यान, शुक्रवारी वेर्णा औद्योगिक वसाहतीतील एका भंगार अड्याला लागलेली आग विझवण्यासाठी मडगाव, पणजी व वास्को येथून २५ अग्निशमन दलाच्या गाड्या घटनास्थळी रवाना करण्यात आल्या. अथक प्रयत्नांनंतर आगीवर नियंत्रण मिळवण्यात यश आले. या १५ दिवसांच्या कालावधीत घडलेल्या विविध घटनांमधून सुमारे ६.८० कोटी रुपयांचे नुकसान झाले असून, जलद आणि प्रभावी कारवाईमुळे ६१.६१ कोटी रुपयांची मालमत्ता वाचवण्यात यश मिळाले.