

पणजी : काव्या कोळस्कर
एकेकाळी गावातील चौकात होणारी कुजबुज काही तासांत विसरली जायची. आज मात्र सोशल मीडियाच्या युगात एखादी चूक काही सेकंदांत लाखो लोकांसमोर पोहोचते. त्यानंतर सुरू होतो न्यायालय नव्हे, तर 'डिजिटल जमावाचा खटला', आरोप, ट्रोलिंग, शिवीगाळ, मीम्स आणि सार्वजनिक अपमान यांचा मारा इतका तीव्र असतो की काही जणांना त्यातून बाहेर पडण्याचा मार्गच दिसत नाही.
गेल्या काही दिवसांत घडलेल्या दोन घटनांनी सर्वांना हादरवून सोडले आहे. गोव्यातील एका तरुणाचा कचरा उघड्या जागेत टाकतानाचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला. त्यानंतर पोलिस चौकशी झाली. चुकीची जाणीव, सामाजिक बदनामी आणि ऑनलाईन टीकेचा प्रचंड दबाव यामध्ये तो तरुण कोलमडला आणि त्याने आत्महत्या केल्याचे समोर आले.
या घटनेने सार्वजनिक लाजिरवाणेपणाची किंमत किती भयानक असू शकते, याची जाणीव करून दिली. दुसरी घटना राजस्थानातील सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर अनिता बिश्नोई यांच्याशी संबंधित आहे. एका व्हायरल व्हिडीओनंतर त्यांच्यावर मोठ्या प्रमाणात ट्रोलिंग सुरू झाले. मानसिक त्रास आणि सातत्याने होणाऱ्या ऑनलाईन हल्ल्यांमुळे त्यांनी इन्स्टाग्राम लाईव्हदरम्यान विष प्राशन केल्याची घटना समोर आली.
हे फक्त दोन प्रसंग नाहीत. ते आपल्या समाजातील एका खोल बदलाचे संकेत आहेत. तज्ञांच्या मते, आत्महत्येचा निर्णय एका घटनेमुळे होत नाही. त्यामागे अपराधीपणा, एकटेपणा, नैराश्य, सामाजिक भीती भविष्याबद्दलची निराशा आणि अनेक घटकांचा एकत्रित परिणाम भावनिक आधाराचा अभाव अशा असतो.
समाज म्हणून अधिक सजग होण्याची गरज
सततची तुलना, दडपण, परिपूर्ण दिसण्याची अपेक्षा, करिअरची अनिश्चितता, ऑनलाईन प्रतिष्ठेची चिंता या सर्वांचा मानसिक आरोग्यावर परिणाम होत आहे. जागतिक स्तरावरील अनेक अभ्यासांमध्ये ऑनलाइन बुलिंग, अपमान आणि मानसिक आरोग्य यांचा घनिष्ठ संबंध आढळून आला आहे. विशेषतः तरुणांमध्ये सार्वजनिक अपमान हा गंभीर मानसिक धक्का ठरू शकतो. यासाठी आपण समाज म्हणून अधिक सजग, अधिक संवेदनशील आणि अधिक सहृदय होण्याची गरज सध्या अधोरेखित होत आहे.
'पब्लिक शेमिंग'ची नवी संस्कृती
आज सोशल मीडियावर चुकीला विरोध करण्याऐवजी व्यक्तीला संपवण्याची प्रवृत्ती वाढताना दिसते. कचरा टाकणे चुकीचे आहे. चुकीच्या विधानांवर टीका होऊ शकते. कायदेशीर कारवाईही होऊ शकते. पण चूक करणाऱ्या व्यक्तीचा मानवी चेहरा विसरून तिच्यावर द्वेषाचा वर्षाव करणे हा न्याय नसून 'डिजिटल जमावशाही' आहे.
नेमके बदलले काय ?
क्लिनिकल सायकॉलॉजीस्ट डॉ. गीतांजली लेले यांच्या मते, आजच्या पिढीचे आयुष्य प्रत्यक्ष जगापेक्षा डिजिटल जगाशी अधिक जोडले गेले आहे. व्यक्तीची ओळख, प्रतिष्ठा, मैत्री, लोकप्रियता आणि आत्मविश्वास यांचा मोठा भाग सोशल मीडियावर अवलंबून झाला आहे. पूर्वी एखादी चूक काही लोकांपुरती मर्यादित राहायची. आता डॉ. गीतांजली लेले ती लाखो लोकांच्या प्रतिक्रिया, टोमणे आणि निर्णयांसमोर उघडी पडते. एका क्लिकवर हजारो अनोळखी लोक एखाद्याला दोषी ठरवतात. त्यामुळे' मी चुकीचा आहे' ही भावना अनेकदा ' मी निरुपयोगी आहे' या धोकादायक निष्कर्षात बदलली आहे