

पेडणे : पुढारी वृत्तसेवा
राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ६६ वरील धारगळ येथे सुरू असलेल्या उड्डाणपुलाच्या कामाला अपेक्षित गति मिळत नसल्याने परिसरात दररोज तीव्र वाहतूक कोंडी होत आहे. विशेषतः रस्त्याच्या मध्यभागी उभारण्यात आलेल्या दोन मुख्य खांबांच्या परिसरात वाहने अत्यंत संथ गतीने मार्गक्रमण करत असल्याने सकाळ आणि सायंकाळाच्या वेळी वाहनांच्या लांबच लांब रांगा लागत आहेत. याचा फटका स्थानिक नागरिक, नोकरदार, विद्यार्थी, पर्यटक तसेच मालवाहतूक करणाऱ्या वाहनचालकांना बसत आहे.
मनोहर आंतरराष्ट्रीय विमानतळाकडे जाणाऱ्या वाहनांची संख्या दिवसेंदिवस वाढत असताना उड्डाणपुलाच्या कामाचा वेग मात्र मंदावलेला दिसत आहे. परिणामी, धारगळ चौक आणि परिसरात वारंवार वाहतूक ठप्प होत असून वाहनचालकांना बराच वेळ रस्त्यावरच अडकून राहावे लागत आहे.
स्थानिक नागरिकांच्या मते, उड्डाणपुलाचे काम लवकर पूर्ण होईल, अशी अपेक्षा होती. मात्र, अनेक महिन्यांपासून काम संथ गतीने सुरू असल्याने जनतेमध्ये नाराजीचे वातावरण निर्माण झाले आहे.
वाहतूक कोंडीमुळे रुग्णवाहिका, शालेय बस आणि इतर अत्यावश्यक सेवांनाही अडथळा निर्माण होत असल्याची तक्रार नागरिकांनी केली आहे. या वाहतूक कोंडीचा परिणाम व्यापारी वर्गावरही होत असून ग्राहकांना वेळेत पोहोचणे कठीण होत आहे. सततच्या वाहतूक कोंडीमुळे इंधनाचा अतिरिक्त खर्च, वेळेचा अपव्यय आणि प्रदूषणात वाढ होत असल्याने संबंधित यंत्रणांनी उड्डाणपुलाच्या कामाचा वेग तातडीने वाढवावा, अशी मागणी नागरिकांनी केली आहे.
राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण, प्रशासन आणि संबंधित कंत्राटदार यांनी समन्वय साधून उड्डाणपुलाचे काम युद्धपातळीवर पूर्ण करावे. तसेच काम पूर्ण होईपर्यंत वाहतूक सुरळीत ठेवण्यासाठी प्रभावी नियोजन करावे, अशी जोरदार मागणी स्थानिकांनी केली आहे. मोपा मनोहर आंतरराष्ट्रीय विमानतळासाठी हा मार्ग अत्यंत महत्त्वाचा असल्याने या प्रकल्पाला प्राधान्य देऊन लवकरात लवकर पूर्णत्वास न्यावे, अशी अपेक्षा नागरिकांनी व्यक्त केली.