

मडगाव : पुढारी वृत्तसेवा
वाढते इंधन दर, घटते उत्पन्न, अपुऱ्या मूलभूत सुविधा आणि प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे वाहतूक व्यवसाय करणे दिवसेंदिवस कठीण होत असल्याची व्यथा कुंकळ्ळीतील रिक्षाचालक, मोटरसायकल पायलट, पिकअप वाहनचालक तसेच इतर वाहतूक व्यावसायिकांनी व्यक्त केली.
वाहतूक क्षेत्रातील असंघटित घटकांच्या विविध समस्या जाणून घेण्यासाठी माजी आयएएस अधिकारी एल्विस गोम्स यांनी आयोजित केलेल्या संवाद बैठकीत शासनाने तातडीने कल्याणकारी योजना राबवून या प्रश्नांकडे गांभीर्याने लक्ष द्यावे, अशी मागणी करण्यात आली.
वाहतूक क्षेत्रातील असंघटित घटकांना प्रथमच एकत्र येऊन आपल्या समस्या थेट मांडण्याची संधी मिळाल्याने बैठकीला उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. कुंकळ्ळी आणि परिसरातील विविध भागांतील रिक्षाचालक, मोटरसायकल पायलट, पिकअप वाहनचालक तसेच इतर वाहतूक व्यावसायिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. प्रत्येकाने आपल्या दैनंदिन व्यवसायातील अडचणी मांडत शासन आणि प्रशासनासमोर वास्तव परिस्थिती मांडली.
बैठकीत वाढत्या इंधन दरामुळे व्यवसायाचा खर्च मोठ्या प्रमाणात वाढला असून, त्यानुसार भाडेदरात वाढ होत नसल्याने आर्थिक ताण सहन करावा लागत असल्याचे व्यावसायिकांनी सांगितले. वाहनांची देखभाल, विमा, परवाने, दुरुस्ती, इंधन आणि इतर खर्च झपाट्याने वाढत असताना उत्पन्नात कोणतीही वाढ होत नसल्याने अनेक कुटुंबांचा उदरनिर्वाह धोक्यात आल्याची खंत त्यांनी व्यक्त केली.
याशिवाय वाहनतळांची कमतरता, प्रवासी आणि चालकांसाठी आवश्यक सुविधा नसणे, स्वच्छतागृहे, पिण्याच्या पाण्याची व्यवस्था तसेच विश्रांतीसाठी जागांचा अभाव यामुळे काम करताना मोठ्या अडचणींना सामोरे जावे लागत असल्याचे उपस्थितांनी सांगितले. परवाने आणि नूतनीकरण प्रक्रियेत होणारा विलंब, शासकीय कार्यालयांतील गुंतागुंतीच्या प्रक्रिया तसेच वाहतूक नियमांच्या अंमलबजावणीदरम्यान उद्भवणाऱ्या समस्यांबाबतही अनेकांनी नाराजी व्यक्त केली.
बैठकीत प्रत्येक सहभागीला आपले मत मांडण्याची संधी देण्यात आली. अनेक चालकांनी वैयक्तिक अनुभव मांडताना वाढती स्पर्धा, व्यवसायातील बदलते स्वरूप आणि आर्थिक अस्थिरतेमुळे निर्माण झालेल्या अडचणींवर प्रकाश टाकला. काहींनी वाहतूक व्यवसायासाठी स्वतंत्र धोरणाची आवश्यकता व्यक्त केली, तर काहींनी असंघटित कामगारांसाठी विमा संरक्षण,
आरोग्य सुविधा, निवृत्तीवेतन आणि इतर सामाजिक सुरक्षा योजनांची अंमलबजावणी करण्याची मागणी केली. यावेळी एल्विस गोम्स यांनी उपस्थितांनी मांडलेल्या प्रत्येक प्रश्नाची सविस्तर नोंद घेतली. स्थानिक पातळीवरील प्रश्न सोडवण्यासाठी प्रयत्न केले जातील, तर मागण्यांसाठी शासन आणि संबंधित विभागांकडे सातत्याने पाठपुरावा केला जाईल, अशी ग्वाही त्यांनी दिली.
गोम्स म्हणाले, "वाहतूक क्षेत्र हा स्थानिक अर्थव्यवस्थेचा महत्त्वाचा कणा आहे. रिक्षाचालक, मोटरसायकल पायलट, पिकअप वाहनचालक आणि इतर वाहतूक व्यावसायिक नागरिकांना अत्यावश्यक सेवा पुरवितात. त्यांच्या समस्या केवळ वैयक्तिक नसून त्या समाज आणि प्रशासनाशी निगडित आहेत.
त्यामुळे त्या सोडवण्यासाठी सर्वांनी एकत्रितपणे प्रयत्न करणे आवश्यक आहे. वाहतूक व्यावसायिकांना शासनाच्या विविध कल्याणकारी योजनांचा लाभ मिळवून देण्यासाठी आवश्यक मार्गदर्शन करण्यात येईल. तसेच त्यांच्या मागण्या शासन आणि संबंधित विभागांपर्यंत प्रभावीपणे पोहोचवून त्यावर सकारात्मक निर्णय व्हावेत, यासाठी सातत्याने पाठपुरावा केला जाईल.