

पणजी : प्रभाकर धुरी
काँग्रेसची राज्यातील चाळीसही विधानसभा जागांवर लढण्याची तयारी आहे. आपल्याकडे ४० उमेदवार असल्याचा दावाही काँग्रेसने केला आहे. असे असले, तरी मित्रपक्षांसाठी मात्र काँग्रेसने आघाडीचे दरवाजे खुले ठेवले आहेत. आप आणि आरजी आघाडीत सामील व्हायला इच्छुक आहेत, त्यांच्यात लवकरच चर्चाही होईल. गोवा फॉरवर्ड पक्षाचे अध्यक्ष आमदार विजय सरदेसाई यांनी मात्र काँग्रेसशी आघाडीविषयक बोलणी स्थगित ठेवून 'जिथे गाव, तिथे मी'चा नारा देऊन 'एकला चलो रे' च्या माध्यमातून पक्षाची ताकद आणि मतदारांशी जोडले जाण्याचे संकेत दिले आहेत.
काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष गिरीश चोडणकर यांच्याशी संवाद साधला. चोडणकर यांना तुम्ही निवडणूक लढविण्यायासाठी इच्छुक आहात का असे विचारले असता त्यांनी 'हो' असे उत्तर दिले. तुम्ही कोणत्या मतदारसंघातून लढणार याचे उत्तर त्यांनी पक्ष सांगेल त्या मतदारसंघातून लढणार असे गिरीश चोडणकर सांगून आघाडी झाली, तर फातोर्डा मतदारसंघावर सरदेसाई यांचा दावा असणार आहे, मग तुमचे काय, या प्रश्नावर चोडणकर म्हणाले की, सरदेसाई त्या मतदारसंघाचे विद्यमान आमदार आहेत. त्यामुळे त्यांनी दावा करणे सयुक्तिक आहे. पण, मी कुठल्या मतदारसंघातून लढायचे हे पक्ष ठरवणार.
निवडून आल्यानंतर भाजपमध्ये प्रवेश केलेल्या आमदारांना राजकीय गरज म्हणून पुन्हा काँग्रेसमध्ये घ्याल का, असे विचारता चोडणकर म्हणाले की, त्यांना पुन्हा काँग्रेसमध्ये घेण्याचा प्रश्नच नाही. अजिबात नाही. या संवादावरून काँग्रेसने चाळीसही जागा लढवण्याची तयारी ठेवल्याचे दिसते. दुसरीकडे त्यांनी आघाडीचे दरवाजे मित्रपक्षांसाठी खुले ठेवले आहेत. असे असले तरी, प्रदेशाध्यक्ष या नात्याने चोडणकर यांच्यासमोर पक्षातील अंतर्गत मतभेद मिटविण्याचे आव्हान असणार आहे. माजी प्रदेशाध्यक्ष अमित पाटकर, त्यांचे समर्थक आणि चोडणकर यांच्यातील मतभेद उघड आहेत.
राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांच्या दौऱ्यावेळी १०८ बीएलएनी दिलेले राजीनामे अंतर्गत मतभेदाचे उदाहरण म्हणावे लागेल. त्यामुळे त्याकडे चोडणकर यांना अधिक लक्ष द्यावे लागेल. काँग्रेसने गठित केलेल्या राजकीय सल्लागार समितीवरही अनेकांनी प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहेत. त्यातील वास्तवता तपासून पक्षाला राजकीय यश मिळवून देणारे नव्या दमाचे आणि सक्रिय होऊन काम करणारे सदस्य समितीत समाविष्ट करावे लागतील.
चोडणकर स्पष्टच बोलले...
सध्या काँग्रेसबाबत विरोधकांकडून वेगवेगळा अपप्रचार सुरू आहे. त्याबाबत चोडणकर यांनी कुणी काय बोलावे हे आम्ही नाही ठरवू शकत. कुणी काहीही बोलू शकते, असे सांगून अपप्रचाराला काँग्रेस बधणार नाही, असेच स्पष्ट केले. तथापि, काँग्रेस नेते व माजी खासदार फ्रान्सिस सार्दिन यांनी पहिला कॅसिनो मी आणला, असे सांगून खळबळ उडवून दिली. तो कॅसिनो काँग्रेसने आणला नव्हता, असे त्यांनी म्हटले असले, तरी किंवा ती भाजपच्या विधानावरील उलटे पडले.
प्रतिक्रिया असली, तरी ऐन निवडणुकीआधी ते विधान जाहीर झाल्याने त्याचा अर्थ सोयीस्कर घेऊन काँग्रेसविरोधी मत विरोधक तयार करू शकतील. सार्दिन हे ज्येष्ठ व अभ्यासू नेते आहेत. त्यांना काँग्रेसमध्ये मानाचे पदही मिळाले असते. मात्र, २०१४ मध्ये केंद्रात भाजपची सत्ता आल्याने फासेते काहीही असले, तरी सद्यस्थितीत काँग्रेसचे नुकसान करणारे कोणतेही विधान करताना प्रत्येकाने दक्षता घ्यायला हवी आणि प्रदेशाध्यक्ष म्हणून चोडणकर यांनी किंवा गोवा प्रभारी माणिकराव ठाकरे यांनी सगळ्यांना सूचना द्यायला हवी, असेच अनेकांना वाटते आहे.
काँग्रेसकडे उमेदवार आहेत; पण आघाडीची अपेक्षा
चोडणकर यांनी यावेळी काँग्रेस हा राष्ट्रीय पक्ष आहे. गावागावांत पक्ष पोचलेला असल्याने पक्षाकडे उमेदवारही असतात. काँग्रेसकडे चाळीसही जागा लढवण्यासाठी उमेदवार असले, तरी आम्हाला आघाडी अपेक्षित आहे. आपचे राष्ट्रीय संयोजक अरविंद केजरीवाल गोव्यात येत आहेत. त्या तयारीत राज्य संयोजक असल्याने आपकडून आघाडीच्या चर्चेसाठी वेळ मागून घेण्यात आला आहे, तर एक दोन दिवसांत आरजीसोबत चर्चा होईल. सरदेसाई यांनी चर्चा स्थगित ठेवली असली, तरी त्यांच्याशीही चर्चा होईल, असेही चोडणकर म्हणाले.
निष्ठावान उमेदवार निवडण्याचे आव्हान
काँग्रेसमधून १२ आमदार बाहेर पडून भाजपला मिळाले आहेत. सर्वांचेच तिथे पुन्हा पुनर्वसन होईल किंवा त्यांना यावेळी उमेदवारी मिळेल, असे नाही. त्यातील पुन्हा काहीजण काँग्रेसकडे येण्याच्या तयारीत असतील. अर्थात त्यांची वाट काँग्रेसने बंद केल्याचे जाहीर केल्याने त्या बाराही जणांच्या जागी पक्षाशी निष्ठा ठेवून निवडून आल्यावर पुन्हा भाजपमध्ये जाणार नाहीत, असे विश्वासू, निष्ठावान उमेदवार काँग्रेसला शोधावे लागतील. हेही वेगळे आव्हान चोडणकर यांच्यासमोर असेल, भाजपमधील काहीजण काँग्रेसमध्ये येऊ शकतात. ज्यांचा भाजपकडून ऐनवेळी भ्रमनिरास होईल किंवा त्यांच्याऐवजी दुसऱ्याला भाजप उमेदवारी देईल, असा आमदार किंवा पदाधिकारी काँग्रेसकडे येऊ शकतात. त्यांच्याबाबतही काँग्रेसला योग्य निर्णय घ्यावे लागतील.