

पणजी : पुढारी वृत्तसेवा
चिंबल ग्रामसभा पंचायतीच्या सभागृहात न घेता ती खुल्या जागेत घेण्याच्या मागणीला सरपंच संदेश शिरोडकर यांनी विरोध केल्याने ग्रामस्थ आक्रमक बनले. या मागणीकरून तब्बल तीन तास गोंधळ झाला.
ही ग्रामसभा आता शक्य नसल्यास ती पुढे ढकलण्याची मागणी ग्रामस्थांनी केली. त्यानुसार ही ग्रामसभा सरपंच शिरोडकर यांना नमते घेऊन २९ मार्चला ठेवल्याचे आश्वासन दिले. ग्रामस्थांच्या आग्रही भूमिकेमुळे सरपंचांना अखेर ही ग्रामसभा तहकूब करावी लागली. या ग्रामसभेला मोठ्या प्रमाणात ग्रामस्थ येणार असल्याची माहिती गेल्या शुक्रवारी (१३ मार्च) ईमेलद्वारे चिंबल सरपंचांना देण्यात आली होती.
मात्र, तरीही ग्रामसभा पंचायतीच्या सभागृहात आयोजित करण्यात आली. या सभागृहात असलेली जागा कमी असल्याने सर्व ग्रामस्थांना उपस्थित राहणे शक्य होणार नसल्याचे समाज कार्यकर्ते गोविंद शिरोडकर यांनी सरपंचांना सांगण्याचा प्रयत्न केला.
मात्र, या ग्रामसभेची नोटीस २३ फेब्रुवारी रोजी काढण्यात आली होती व त्यामध्ये ग्रामसभेचे ठिकाण त्यात नमूद केले होते. शेवटच्या क्षणी ग्रामस्थांनी ही ग्रामसथा खुल्या जागेत घेण्याची मागणी केल्याने ऐनवेळी ते शक्य नसल्याचे त्यांनी ग्रामस्थांना सांगितले. सरुपंचांनी ग्रामसभा सर्व ग्रामस्थांना त्यामध्ये सहभागी होता येईल अशा ठिकाणी घेण्यास विरोध केल्याने ग्रामस्थ पेटून उठले. त्यांनी सरपंचांच्या राजीनाम्याची मागणी केली.
ग्रामसभा खुल्या जागेत घेण्यास काय अडचण आहे, असा प्रश्न ग्रामस्थांनी केला. ग्रामसभेला जमलेले लोक मोठ्या प्रमाणात असल्याने ते पंचायत सभागृहात मावणार नाहीत. त्यामुळे ही ग्रामसभा रद्द करून पुढील ग्रामसभेसाठी पंचायतीने शामियाना उभारावा व सर्वांना त्यांचे प्रश्न मांडण्यासाठी ग्रामसभेस उपस्थित राहण्याची संधी द्यावी, असे मत गोविंद शिरोडकर यांनी मांडले.