

म्हापसा : पुढारी वृत्तसेवा
रस्ता ओलांडताना पादचाऱ्याच्या निष्काळजीपणामुळे झालेल्या अपघातात चार वाहनांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. परंतु सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही. हा अपघात मंगळवारी सकाळी म्हापसा करासवाडा जंक्शन जवळील राष्ट्रीय महामार्गावर घडला.
महामार्गावर सकाळच्या वेळेस वाहनांची वर्दळ असते. एक पादचारी अचानक रस्ता ओलांडण्यासाठी पुढे आला. त्याला धडक बसू नये याकरिता येणाऱ्या वाहनाने क्षणाधार्त ब्रेक मारला. मात्र मागून भरधाव वेगाने येणाऱ्या कदंबा बस, कार आणि पिकअप वाहनांच्या चालकांना वाहनांवरील नियंत्रण राखता आले नाही.
त्यामुळे बस, कार व पिकअप वाहने एकमेकांवर आदळून साखळी अपघात झाला. या अपघाताचा आवाज मोठ्या प्रमाणात झाल्याने परिसरातील नागरिकांनी इतर वाहन चालक तातडीने घटनास्थळी धावले.
कारच्या पुढील व मागील भागाचे मोठे नुकसान झाले असून या जोरदार धडकेमुळे कार मधील एअरबॅग्जही उघडल्या. तसेच पिकअप वाहन आणि कदंब बसच्या भागाचेही मोठे नुकसान झाले.
या विचित्र अपघातामुळे या महामार्गावरील वाहतूक बराच काळ विस्कळीत झाली होती. वाहतूक पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत अपघातग्रस्त वाहने रस्त्याच्या बाजूला हलवून वाहतूक पूर्ववत केली. पादचाऱ्यांच्या निष्काळजीपणामुळे हा अपघात घडल्याचे समोर आले असले तरी या प्रकरणी म्हापसा अधिक तपास करीत आहेत.