

वाळपई : पुढारी वृत्तसेवा
होंडा पंचायत क्षेत्रातील सालेली येथे सुक्या गवताला आग लागून काजू बागायतीचे मोठे नुकसान झाले, या घटनेत लाखो रुपयांचे नुकसान झाले असून २०० हून अधिक काजू कलमांचे नुकसान झाल्याचा अंदाज अग्निशमन दलाच्या जवानांकडून व्यक्त होत आहे.
अग्निशामक दलाच्या जवानांनी मोठ्या प्रमाणात मालमत्ता वाचविण्यास यश मिळविले. सालेली या ठिकाणी काजू बागायतीला आग लागण्याची घटना गुरुवारी दुपारी घडली. काजू उत्पादकांनी सदर आग विझविण्याचा प्रयत्न केला.
मात्र, सुक्या गवताला आग लागल्यामुळे वाऱ्यासह आग फोफावली. आग आटोक्यात आणणे शक्य न झाल्यामुळे वाळपई अग्निशामक दलाच्या यंत्रणेला पाचारण करण्यात आले त्यांनी आग आटोक्यात आणली. अनेक काजू उत्पादकांना लाखो रुपयांचा फटका बसलेला आहे.
मरड-म्हापशात गवताला आग
अग्निशमन दलाची तल्परता; कचरा जाळण्यासाठी आग लावल्याचा संशय
मरड, म्हापसा येथील एका हॉटेलच्या बाजूला असलेल्या मोकळ्या जागी फेकलेल्या कचऱ्याला आग लागली. म्हापसा अग्निशामक दलाच्या जवानांनी त्वरित घटनास्थळी जाऊन आग आटोक्यात आणली.
सुदैवाने कोणतीही जीवित हानी झाली नाही. या मोकळ्या जागेत गवत वाढलेले असून या ठिकाणी कचरा तसेच रबराचे टाकाऊ सामान फेकले होते. कचऱ्याला आग लागल्यामुळे आगीचे व धुराचे लोळ उठले होते. कचरा जाळून टाकण्यासाठी ही आग लावण्यात आली, असावी असा अंदाज अग्निशामक दलाकडून वर्तवण्यात येत आहे.