

पणजी : पुढारी वृत्तसेवा
मोरजी येथील टेंबवाडा येथे ॲड. अंकुर कुमार यांच्यावर झालेल्या भ्याड हल्ल्याचा काँग्रेसचे प्रसिद्धीमध्यम प्रमुख अमरनाथ पणजीकर यांनी तीव्र शब्दांत निषेध केला. यावेळी प्रदेशाध्यक्ष गिरीश चोडणकर, युवक काँग्रेसचे अध्यक्ष अर्चित नाईक आणि एनएसयूआयचे राज्य सरचिटणीस कुमार अर्जुन गवळी उपस्थित होते.
पणजीकर म्हणाले की, गोवा किनारपट्टी क्षेत्र व्यवस्थापन प्राधिकरण तसेच उच्च न्यायालय आणि सर्वोच्च न्यायालयाने बेकायदेशीर बांधकामांबाबत दिलेल्या पाडकामाच्या आदेशांच्या अनुषंगाने ॲड. अंकुर कुमार हे जमीनमालक अनिल नाईक यांच्यासमवेत संबंधित स्थळाची पाहणी करण्यासाठी गेले होते.
यावेळी वकिलावर झालेला हा गुन्हेगारी स्वरूपाचा हल्ला केवळ एका व्यक्तीवरील हल्ला नसून तो कायद्याच्या व्यवहारावर आणि न्यायव्यवस्थेवर थेट हल्ला आहे. अशा प्रकारच्या घटना कोणत्याही सुसंस्कृत समाजासाठी अत्यंत धोकादायक असून त्या अजिबात सहन केल्या जाणार नाहीत.
पणजीकर पुढे म्हणाले की, कोणालाही कायदा हातात घेण्याचा अधिकार नाही. न्यायालयाच्या आदेशांबाबत किंवा कायदेशीर प्रक्रियेबाबत कोणाचीही नाराजी असल्यास त्यावर उपाय हा न्यायालयीन प्रक्रियेतच शोधला पाहिजे. हिंसा, धमकी किंवा जमावशाहीच्या माध्यमातून न्याय मिळू शकत नाही.
कायद्यानेच आपले काम केले पाहिजे. वकील हे न्यायव्यवस्थेचे अविभाज्य घटक असून न्यायदान प्रक्रियेत न्यायालयाला सहाय्य करणारे अधिकारी आहेत. अन्यायग्रस्त नागरिक न्याय मिळविण्यासाठी वकिलांच्या माध्यमातून न्यायालयात जातात. अशा परिस्थितीत जर वकीलच सुरक्षित नसतील, तर सामान्य नागरिकांचा न्यायव्यवस्थवरील विश्वास कसा टिकणार, असा सवाल त्यांनी उपस्थित केला.