

हणजूण : पुढारी वृत्तसेवा
हणजूण कायसुव पंचायतीने पंचायत क्षेत्रात उद्भवलेली मटक्या जनावरांची समस्या सोडवण्याकरिता मये, सिकेरी येथील गोशाळेची सामंजस्य करार केल्यानंतर सुटेल असे वाटले होते; परंतु पंचायत क्षेत्रात या मोकाट जनावरांच्या होणाऱ्या उपद्रवामुळे ही समस्या अद्याप जैसे थे असल्याचे दिसून येत आहे.
पंचायत क्षेत्रात भटक्या गुरांची समस्या अनेक वर्षांपासून भेडसावत आहे. रस्त्यावर ठाण मांडून बसणाऱ्या तसेच उभ्या असलेल्या या गुरांमुळे अनेकदा लहान मोठे अपघात झालेले आहेत. रात्रीच्या वेळेस असे अपघात होण्याची शक्यता जास्त असते. शेतकरी आपली जनावरे मोकाट सोडून देतात.
ती चारा खाण्यासाठी इतरत्र फिरत राहतात. या भटक्या जनावरांचा बंदोबस्त करण्याकरिता अनेकवेळा ग्रामसभेतून ठरावही घेण्यात आला होता. या भटक्या गुरांचा बंदोबस्त करावा याकरिता पंचायतीने कोंडवाडा बांधला होता; परंतु बुल अटेंडेंट मिळत नसल्याच्या नावाखाली त्याचा काहीच उपयोग झाला नाही. अनेकवेळा मागणी केल्यानंतर दोन महिन्यापूर्वीच पंचायतीने सिकेरी, मये येथील गोशाळेशी सामंजस्य करार केला. शेतकऱ्यांनी आपल्या गुरांना गोठ्यात बांधून ठेवावे, असे आवाहनही यावेळी सरपंचांनी केले होते.
कोमुनिदादकडून जागा उपलब्ध करून घ्यावी
या भटक्या गुरांचा बंदोबस्त करण्याकरिता पंचायतीने हणजूण कोमुनिदादकडून जागा उपलब्ध करून घ्यावी व त्या ठिकाणी भटक्या गुरांची सोय करावी, अशी मागणी हणजूण कायसुव जैवविविधता व्यवस्थापन समितीने पंचायतीकडे केली आहे.
गोशाळेकडून
या गोशाळेच्या कर्मचाऱ्यांकडून दोनवेळा येथील काही भटकी गुरे पकडून नेली; परंतु त्यानंतर मोकाट जनावरे नेण्याचे काम बंद पडले. मिळालेल्या माहितीनुसार, या गोशाळेत गुरांची संख्या वाढल्याने गुरे नेण्याचे बंद केले असल्याचे सांगण्यात आले आहे. त्यामुळे या मोकाट जनावरांची समस्या या पंचायत क्षेत्रात अद्याप जैसे थे दिसून येत आहे.