

सासष्टी : घोगळ गृहनिर्माण वसाहतीतील सुन्नी गुलिस्तान मशिदीचा उपाध्यक्ष अली कलंदर खानजादे याच्या खून प्रकरणी पोलीसांनी अटक केलेले आलम सय्यद, लतीफ सय्यद, उबेद्दुला मकंदर व निजामुद्दीन सय्यद या चौघांच्या जामीन अर्जावर आता या गुरुवारी ( ता. २६ ) रोजी निवाडा होणार आहे.
आज सोमवारी दक्षिण गोवा सत्र न्यायालयाचे न्यायाधीश राम प्रभुदेसाई यांच्या न्यायालयात वरील संशयितांचे जामीन अर्ज सुनावणीस आले. यावेळी सरकारपक्षाने युक्तिवाद करताना, संशयितांविरुद्ध गंभीर स्वरूपाचे गुन्हे नोंद असून, त्यांना जामीन देऊ नये अशी मागणी केली.
तर या गुन्हांचा तपास पूर्ण झाल्याने आपल्या अशिलांना कोठडीची गरज नसल्याने त्यांना जामीन मंजूर करावा अशी मागणी संशयितांच्या वकिलांनी केली. दोन्ही बाजूचे युक्तीवाद ऐकून घेऊन न्यायालयाने २६ फेब्रुवारीला आपला निवाडा ठेवला आहे.
मागच्या महिन्यात ३० जानेवारी रोजी शुक्रवारच्या नमाजानंतर अली कलंदर खानजादे याचा पोटात चाकू खुपसून खून केला होता. मशिद समितीवर कुणाचा ताबा असावा या वादावरून खुनाचे हे थरारनाट्य घडले होते.
या प्रकरणी फातोर्डा पोलिसांनी अक्रम खान यांच्यासहित आलम सय्यद, लतीफ सय्यद, उबेद्दुला मकंदर, सक्रुद्दिन शेख, हुसेन खान, निजामुद्दीन सय्यद व साहिल कन्वी उर्फ स्पाकी या आठ जणांना अटक केली होती.
हे सर्व संशयित सध्या कोलवाळ च्या न्यायायालयीन कोठडीत आहेत. पोलिसांनी त्यांच्यावर भारतीय न्याय संहितेच्या १०३ (२) , ६१ , ३५१ व १९० कलमाखाली गुन्हा दाखल केला आहे. तर याच प्रकरणात मागच्या दोन दिवसांपूर्वी सर्फराज मकंदर आणि मेहबूब मकंदर या दोन भावांचा अटकपूर्व जमीन अर्ज न्यायालयाने फेटाळून लावला आहे.