

पणजी : पुढारी वृत्तसेवा
गोव्यात २०२० ते २०२४ या पाच वर्षांच्या कालावधीत एकूण २५६ मुले बेपत्ता झाल्याची नोंद झाली. त्यापैकी १५० मुलांचा अद्याप शोध लागलेला नसून, ५८ टक्के मुले बेपत्ता असल्याचे केंद्रीय गृहमंत्रालयाने संसदेत दिलेल्या माहितीतून समोर आले आहे.
राष्ट्रीय गुन्हे नोंदणी ब्युरोच्या आकडेवारीनुसार, २०२० मध्ये गोव्यात ५२ मुले बेपत्ता झाली होती. त्यापैकी २२ मुलांचा शोध लागला, तर ३० मुले अद्याप बेपत्ता आहेत. २०२१ मध्ये ४३ मुले बेपत्ता झाली; १४ मुलांचा शोध लागला आणि २९ जणांचा शोध लागला नाही.
२०२२ मध्ये ५५ मुले बेपत्ता झाली, त्यापैकी २३ मुलांचा शोध लागला तर ३२ मुले अद्याप बेपत्ता आहेत. २०२३ मध्ये बेपत्ता झालेल्या ४८ मुलांपैकी १७ मुलांचा शोध लागला असून ३१ मुले अद्याप सापडलेली नाहीत. २०२४ मध्ये ५८ मुले बेपत्ता झाली; त्यापैकी ३० मुलांचा शोध लागला, तर २८ मुले अद्याप बेपत्ता आहेत.
या तीन वर्षांच्या कालावधीत गोव्यात मानवी तस्करीच्या प्रकरणांमध्ये ८८ आरोपींना अटक करण्यात आली. मात्र, या पाच वर्षांत केवळ चार आरोपी दोषी ठरले आहेत. २०२० मध्ये मानवी तस्करीप्रकरणी २७ जणांना अटक झाली होती. २०२१ मध्ये २६, २०२२ मध्ये २२, २०२३ मध्ये ११ आणि २०२४ मध्ये २ जणांना अटक केली. या प्रकरणांमध्ये २०२२ आणि २०२४ मध्ये प्रत्येकी दोन आरोपी दोषी ठरल्याची माहिती देण्यात आली.
एकूण बेपत्ता मुले (२०२०-२०२४): २५६ पैकी १५० मुले (५८%) अद्याप बेपत्ता.
मानवी तस्करी कारवाया: ८८ जणांना अटक, पण केवळ ४ आरोपींना शिक्षा (दोषी सिद्ध).
वार्षिक बेपत्ता मुले :
२०२०: ५२ (३० बेपत्ता)
२०२१: ४३ (२९ बेपत्ता)
२०२२: ५५ (३२ बेपत्ता)
२०२३: ४८ (३१ बेपत्ता)
२०२४: ५८ (२८ बेपत्ता)