गोव्यात चार दिवस मुसळधार शक्य; यलो अलर्ट जारी
पणजी; पुढारी वृत्तसेवा : दक्षिण महाराष्ट्र, कर्नाटकच्या किनारपट्टीपासून दूर समुद्रात तयार झालेले टर्फ तसेच नैऋत्येकडून पश्चिमेला वाहणार्या वार्यांमुळे आजपासून ( दि. 24) ते मंगळवार 27 जूनपर्यंत राज्यात सर्वत्र मुसळधार पावसाची शक्यता हवामान खात्याने व्यक्त केली आहे. यानुसार या चार दिवसांसाठी यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे.
शुक्रवारी राज्यात सर्वत्र पावसाने हजेरी लावली. पेडणे, म्हापसा, पणजी, वाळपई, सत्तरी, वास्को, मडगाव, केपे, सांगे , काणकोण येथे पावसाच्या जोरदार सरी बरसल्या. काही ठिकाणी पावसामुळे झाडे मोडून किरकोळ नुकसानीच्या घटना घडल्या. शुक्रवारी मडगाव येथे सर्वाधिक 64.5 मिलिमीटर पावसाची नोंद झाली. सांगे येथे 60 मि.मी., वाळपई येथे 43.5 मि.मी. तर म्हापसा येथे 41 मि.मी. तर दाबोळी येथे 40 मि.मी. पावसाची नोंद झाली.
27 जूनपर्यंत वार्याचा वेग ताशी 40 ते 55 कि.मी. पर्यंत पोहोचण्याची शक्यता असल्याने मच्छिमारांनी समुद्रात उतरू नये, असे आवाहन हवामान खात्याने केले आहे. शुक्रवारी मुरगाव येथे सर्वाधिक 33.6 अंश सेल्सिअस कमाल तापमानाची नोंद झाली. पणजीतील कमाल तापमान 32 अंश सेल्सिअस होते.