म्हादईप्रश्नी केंद्र सरकारने केला गोमंतकीयांचा घात : लुईझीन फालेरो
मडगाव; पुढारी वृत्तसेवा : केंद्र सरकारने 20 ऑगस्टपर्यंत म्हादईबाबत कुठलाही निर्णय घेणार नाही, असे स्पष्ट आश्वासन राज्यसभेत दिलेले असताना कर्नाटकचा डीपीआर मंजूर करण्याची केलेली कृती म्हणजे केंद्राकडून गोमंतकीयाचा विश्वासघात केला आहे, अशी टीका तृणमूल काँग्रेसचे राज्यसभा खासदार लुईझीन फालेरो यांनी केली आहे. फालेरो यांनी म्हादई खोर्याला भेट दिली. त्या पार्श्वभूमीवर एक व्हिडीओ संदेश जारी केला आहे.
नोव्हेंबरमध्ये झालेल्या अधिवेशनात आपण हा प्रश्न राज्यसभेत उपस्थित केला होता. त्यावेळी केंद्रीय वन व पर्यावरणमंत्र्यांकडून मला ऑगस्टपर्यंत कुठलाही निर्णय घेतला जाणार नाही, असे स्पष्ट आश्वासन दिले होते, असे असताना केंद्रीय जल बोर्डाने कर्नाटकचा डीपीआर मंजूर करणे, हा राज्यसभेचा हक्कभंग म्हणावा लागेल, असेही ते म्हणाले. या खोर्यात 6 अभयारण्ये असून, मोले अभयारण्य हे जगातील आठव्या क्रमांकाचे जैव विविधता संवेदनशील क्षेत्र आहे, असे असतानाही केंद्र सरकार गोव्यातील पर्यावरण नष्ट करू पहात आहे, असा आरोप त्यांनी केला आहे.