गोव्यात काॅंग्रेसला मोठा धक्का, दिगंबर कामत, मायकल लोबो यांच्यासह ८ आमदारांचा भाजपमध्ये प्रवेश
पणजी : पुढारी वृत्तसेवा; गोव्यात काॅंग्रेसला मोठा धक्का बसला आहे. दिगंबर कामत व मायकल लोबो यांच्यासह ८ आमदारांनी आज भाजपमध्ये प्रवेश केला. त्यानंतर पत्रकारांशी बोलताना काॅंग्रेस आमदारांनी भाजप प्रवेशाचे कारण स्पष्ट केले. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांचे हात बळकट करण्यासाठी आम्ही भारतीय जनता पक्षात प्रवेश करत असल्याचे दिगंबर कामत व मायकल लोबो यांनी सांगितले.
काँग्रेस पक्षामध्ये कुठलीही शिस्त राहिलेली नाही. या उलट गोव्याचा सर्वांगीण विकास करण्यासाठी मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्या नेतृत्वाखालील सरकार चांगले काम करत आहे. त्याचबरोबर देशात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशाला आत्मनिर्भर व बलशाली करण्यासाठी पाऊले उचलली आहेत. त्यांचे काम आवडल्यामुळे आणि काँग्रेसची संघटना पूर्ण खिळखिळी झालेली असल्यामुळे मतदार संघाच्या विकासासाठी आम्ही काँग्रेस सोडून भाजपात प्रवेश करत आहोत. अशी माहिती दिगंबर कामत व मायकल लोबो यांनी आज दिली.
दिगंबर कामत , मायकल लोबो , डिलायला लोबो, आलेक्स सिक्वेरा, राजेश फळदेसाई , केदार नाईक, संकल्प आमोणकर व रुडाल्फ फर्नांडिस या कॉंग्रेसच्या ११ पैकी ८ आमदारानी आज कॉंग्रेस पक्षाचा त्याग करून भाजपमध्ये प्रवेश केला. त्यानंतर सचिवालयाच्या प्रवेशद्वारावर बोलताना दिगंबर कामत यांनी सांगितले की गोव्यात काँग्रेसला नेतृत्व नाही. काँग्रेसमध्ये एकता नाही. संघटना नाही . पक्षवाढीसाठी काही योजना नाहीत . त्याउलट पंतप्रधान मोदींचे काम सर्वांना आवडले आहे. जगभर भारताला त्यानी सन्मान मिळवून दिलेला आहे. देश बलशाली होत आहे. अनेक योजनांची अंमलबजावणी होत आहे. गोव्यात डॉक्टर सावंत यांचे काम चांगले आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि डॉ. सावंत यांचे हात बळकट करून गोव्याचा सर्वांगीण विकास करण्यासाठी आम्ही भाजपमध्ये प्रवेश करण्याचा निर्णय घेतल्याचे कामत यांनी सांगितले . आपल्या मडगाव मतदारसंघातील कार्यकर्त्यांचीही मागणी होती की आपण काहीतरी निर्णय घ्यावा व काँग्रेस सोडावी. त्यानुसार आपण आपल्या मुळ पक्षात भाजपात प्रवेश केल्याचे सांगून आपणाला अपात्र करण्याची जी याचिका काँग्रेसने सभापतीकडे दाखल केली होती तेव्हापासून आपण पक्षावर नाराज होतो . असे कामत यांनी सांगितले.
काँग्रेस छोडो भाजप जोडो
माजी विरोधी पक्षनेते व काँग्रेसचे आमदार मायकल लोबो यांनी सांगितले की आम्ही आज सकाळी काँग्रेस विधिमंडळ गटाची बैठक घेतली. या बैठकीमध्ये विविध विषय चर्चा केली आणि काँग्रेसची संघटना गोव्यात कोणतेही अस्तित्व दाखवत नसल्यामुळे आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे कार्य सर्वांनाच आवडलेले असल्यामुळे शेवटी सर्वांत आठही आमदाराने काँग्रेस पक्ष सोडण्याचा निर्णय घेतला व तसा ठराव संमत करून तो सचिवालय सचिवांना दिला. तसेच सभापती गोव्यामध्ये नसल्यामुळे त्यांना ई-मेल ही पाठवलेला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री डॉ. सावंत यांचे हात बळकट करण्यासाठी आणि गोव्याचा संपूर्ण विकास करण्यासाठी आम्ही पक्षांतर केलेले आहे. तिकडे राहुल गांधी यांची भारत जोडो यात्रा सुरू केली असली तरी या पक्षाला कुठलेही भवितव्य नाही. त्यामुळे गोव्यामध्ये आम्ही काँग्रेस छोडो भाजपा जोडो ! अभियान राबवले असे लोबो म्हणाले. पंतप्रधानांचे व्हिजन पुढे नेण्यासाठी पक्षांतर केल्याचे सांगून भाजपाच्या अनेक चांगल्या योजनांचा फायदा तळागाळातील लोकांना मिळत आहे आणि सर्वांगीण विकास होत आहे असेही ते म्हणाले .
तर मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी काँग्रेसच्या आठही आमदारांचे भाजपामध्ये स्वागत असल्याचे सांगितले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आत्मनिर्भर भारत करण्याचे जे व्हिजन समोर ठेवून काम सुरू केले आहे ते काम सर्व पक्षातील नेत्यांना आवडत आहेत. त्यामुळे काँग्रेसच्या अकरापैकी आठ आमदारानी भाजपमध्ये प्रवेश करण्याचा जो निर्णय घेतला आहे त्याचा लाभ गोव्याच्या सर्वांगीण विकासासाठी होईलच पण त्यांच्या मतदार संघाच्या विकासासाठी ही निश्चित होणार असल्याचे सांगून आपण या ८ ही आमदाराचे भाजप मध्ये स्वागत करत असल्याचे मुख्यमंत्री म्हणाले .
Goa | 8 Congress MLAs including Digambar Kamat, Michael Lobo, Delilah Lobo, Rajesh Phaldesai, Kedar Naik, Sankalp Amonkar, Aleixo Sequeira & Rudolf Fernandes join BJP in presence of CM Pramod Sawant pic.twitter.com/uxp7YaZAUN
— ANI (@ANI) September 14, 2022
हेही वाचा
- ‘या’ देशात कार नसणाऱ्यांना सरकार देणार १ हजार डॉलर; जाणून घ्या काय आहे कारण?
- Drunk driving : मद्यधूंद अवस्थेत तिघांना उडवले , आराेपीला जामीन मंजूर करताना न्यायालयाने दिला ‘हा’ आदेश
- पुणेः प्रेमसंबंधातून स्वतःसह दुसर्याला पेटविण्याचा प्रयत्न