पणजी , पुढारी वृत्तसेवा : सार्वजनिक बांधकाम विभागातील कनिष्ठ अभियंता पदांची भरती रद्द करण्याच्या सरकारच्या निर्णयामुळे भाजपने राज्यातील युवकांचा वापर निवडणुकीसाठी केल्याचे सिद्ध झाले आहे, असा आरोप आम आदमी पक्षाने मंगळवारी केला.
निवडणुकांपूर्वी 'आप'ने सार्वजनिक बांधकाम खात्यातील नोकरभरती घोटाळ्याचा पर्दाफाश केला होता. नोकर्यांच्या वाटपात पक्षपात करणे हे अन्यायकारक असून आता मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी आरोग्य विभागातील नोकरभरतीची देखील चौकशी सुरू करावी, अशी मागणी 'आप'ने केली आहे.
गोवा प्रदेशाध्यक्ष अमित पालेकर यांनी यापूर्वी साबांखामध्ये गुणवत्तेशिवाय 316 जणांची नियुक्ती केल्याचा आरोप केला होता. नोकरभरती दरम्यान कोणतीही प्रक्रिया पाळली गेली नव्हती आणि नियुक्तीपत्र जारी करण्यापूर्वीच नियुक्ती केली गेली होती, असा दावाही पालेकर यांनी केला
होता.
भाजपच्या मंत्र्याने केला घोटाळा उघड
नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकांच्या अगोदर भाजप सरकारने केलेली नोकरभरती ही गोव्यातील तरुणांची मते मिळविण्यासाठीची भाजप सरकारची रणनीती होती. मात्र त्यांच्याच मंत्र्याने नोकरीचा घोटाळा उघड केल्याने भाजपचा ही रणनीती उघडकीस आली.