

पुणे : विसर्जन मिरवणुकांच्या वेळी पुण्यातील लक्ष्मी रस्त्यावरून प्रथम मानाचे पाच गणपती मंडळच जातील हा रूढी-परंपरा व प्रथेचा भाग म्हणजे कायदा नाही. त्यामुळे लहान गणपती मंडळांना विसर्जनासाठी लक्ष्मी रस्ता वापरण्यावर असणारी बंधने म्हणजे बेकायदेशीर व संविधानातील कलम १९ नुसार असलेले संचार स्वातंत्र्याचे उल्लंघन आहे. अशी याचिका पुणे बढाई समाज ट्रस्टचे अध्यक्ष शैलेश बढाई यांनी थेट मुंबई उच्च न्यायालयात दाखल केली आहे.
गणपती उत्सव काही दिवसात सुरु होणार आहे. त्यातच गणपती विसर्जनाच्या मिरवणुकीच्या वेळी उफाळून येणारा भेदभावाचा, विषमतेचा मुद्दा थेट उच्च न्यायालयात पोहोचला आहे. विसर्जन मिरवणुकांमध्ये शहरातील मानाच्या गणपती मंडळांनाच प्रशासन प्राधान्य देते. दरवर्षी विनंत्या करूनही आमची दखल घेतली जात नसून, पहिल्या पाच मानाच्या गणपती मंडळांच्याद्वारे इतर मंडळांना वेगळी वागणूक देण्यात येते. मागून येणाऱ्या लहान गणपती मंडळांना चांगली वागणूक द्यावी अशी मागणी शैलेश बढाई यांनी याचिकेतून केली आहे.
पोलीस आयुक्त पुणे यांच्यासह पुण्यातील मानाचे समजले जाणारे पाच गणपती मंडळ म्हणजे श्री कसबा गणपती, सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ, तांबडी जोगेश्वरी गणपती, गुरुजी तालीम गणपती, तुळशीबाग गणपती, केसरीवाडा गणपती यांना याचिकेतून प्रतिवादी करण्यात आले असल्याची माहिती अॅड. अजिंक्य उडाणे, अॅड. अजित देशपांडे, अॅड. तृणाल टोणपे व अॅड. अक्षय देसाई यांनी दिली.
अॅड. असीम सरोदे म्हणाले, मानाच्या गणपतींच्या आधी मंडळांना लक्ष्मी रस्त्यावरून मिरवणूक काढायची असेल तर त्यांना पोलीस आयुक्तांनी परवानगी देऊन तशी सोय उपलब्ध करून द्यावी. भेदभाव आणि विषमता निर्माण करणाऱ्या व जोपासणाऱ्या रूढी-परंपरा रद्द करण्यात येत असल्याचे आदेश उच्च न्यायालयाने पारित करावेत अशी मागणी याचिकेतून करण्यात अली आहे