Importance Of Reading | वाचनातून होणारे संस्कार: व्यक्ती, समाज आणि राष्ट्र विकासाची गुरुकिल्ली!

Importance Of Reading | वाचनातून होणारे संस्कार व्यक्ती, समाज व राष्ट्र विकासात महत्त्वाचे ठरतात.बालपणापासूनच ही 'वाचन प्रेरणा' विद्यार्थी- विद्यार्थीनींना मिळाली तर भविष्यात 'सशक्त व सक्षम' अशी नवी पिढी घडण्यास नक्कीच मदत होईल.
Importance Of Reading
Importance Of ReadingAI Image
Published on
Updated on

Importance Of Reading | -डॉ.भाऊसाहेब नन्नवरे

वाचनातून होणारे संस्कार व्यक्ती, समाज व राष्ट्र विकासात महत्त्वाचे ठरतात.बालपणापासूनच ही 'वाचन प्रेरणा' विद्यार्थी- विद्यार्थीनींना मिळाली तर भविष्यात 'सशक्त व सक्षम' अशी नवी पिढी घडण्यास नक्कीच मदत होईल. भारताचे माजी राष्ट्रपती व ज्येष्ठ वैज्ञानिक 'भारतरत्न डॉ.ए.पी.जे.अब्दुल कलाम ' यांचा -१५ ऑक्टोबर हा जन्म दिवस 'वाचन प्रेरणा दिन ' म्हणून साजरा होतो. सध्याचा वाचनव्यवहार, त्याचे महत्व आणि वाचन चळवळ वृद्धिंगत होण्यासाठी सर्व स्तरातून व्यापक प्रयत्न होण्याची गरज आहे. वाचन ही गरजेचीच नाही तर अपरिहार्य अशी गोष्ट आहे, ही जाणीव विकसित व्हायला हवी.

Importance Of Reading
Horoscope 15 October 2025: आजचा दिवस ठरेल तुमच्या आयुष्याचा टर्निंग पॉइंट? तुमची रास काय सांगते?

वाचनाचा संस्कार कशासाठी -

" दिसामाजि काहीतरी ते लिहावे | प्रसंगी अखंडित वाचीत जावे " ही समर्थ रामदासांची रचना वाचन - लेखनाचे महत्व विशद करते. अन्न, वस्र, निवारा या मूलभूत गरजांबरोबरच 'माणूस' म्हणून व्यक्तीचा परिपूर्ण विकास होण्यासाठी वाचन अनिवार्य आहे. आपल्याकडे आजही ग्रंथव्यवहाराला नगण्य स्थान दिले जाते. पुस्तके विकत घेऊन वाचण्याचा व्यवहार, छंद आजही आपल्या अंगवळणी पडलेला दिसत नाही. त्यासाठी केवळ एका दिवसापूरता हा उपक्रम मर्यादित न राहता सातत्याने सर्वांनीच हा 'वाचनाचा हा मौलिक संस्कार' अव्याहतपणे स्वीकारायला हवा.आजच्या काळात नवी पिढी ग्रंथांपासून, वाचनापासून दूर जाताना दिसते आहे. दूरचित्रवाणी व समुह माध्यमांच्या प्रभावातून शाळा - कॉलेजमधले विद्यार्थी व मोठी माणसही वाचनापासून फटकून राहताहेत, हे वास्तव सर्वत्र दिसते.'गोष्टी सांगणारी आजी' आज घराघरात नाही. तिची जागा आता टी.व्ही. आणि मोबाईलने घेतली आहे.अभ्यासक्रमाच्या पलीकडे जाऊन काही वाचायचं नसतं असं मानणारी नवी संस्कृती उदयाला येऊ लागली आहे. त्यातूनच 'कागदोपत्री उच्चशिक्षित' झालेली पिढी घडू नये यासाठी वाचन प्रेरणादिनाचे महत्व आहेच पण त्यासाठी कारणं न सांगता ,पळवाट न शोधता अखंडपणे ही 'वाचन चळवळ' व्यापक स्तरावर वृद्धींगत व्हायला हवी.

काय आणि कसं वाचावं-

काय आणि कसं वाचावं? या प्रश्नाचं साधं सोपं उत्तर आपल्या आवडीनुसार सहज उपलब्ध होईल ते वाचावं,असं देता येईल.वाचनाला सुरवात होणं महत्वाचं ! वाचनाची आवड हवी, व्यसन नको कारण आवडीने चांगलच वाचलं जाईल.मन, बुद्धी, भावना व विचारांचं भरण पोषण होईल,असं वाचता येईल.निकोप असा आनंद ज्यातून मिळेल,योग्य-अयोग्यतेचा दृष्टिकोन देईल ते अखंडीत वाचत जाऊ या.आपल्या सर्वांच्या वाचण्यात सहजपणे येतं ते वर्तमानपत्र. 'वर्तमानाच भान' येण्यापूरतं ते वाचावं.दिवसभर वाचण्याची ती गोष्ट नव्हे. रविवारच्या पुरवण्या, त्यातील सदरे, संपादकीय व स्फुटलेख, वाचक पत्रे यातून ज्ञानात भर पडते,'विचारविवेक' जागृत होतो; पण खरं ज्ञान आहे ते शेवटी पुस्तकातच !!

'तमसो मा ज्योर्तिगमय् |' या वचनाप्रमाणे मनातला अंधार दूर करून मन व विचाराला प्रकाशमान करण्याचं काम वाचनातून घडतं. कथा, कादंबरी, नाटक, चरित्र, आत्मचरित्र, इतिहास, संतसाहित्य, तत्वज्ञानपर विचार,विज्ञान,कला यातील आपल्या आवडीचे वाचत गेलो तर आनंदप्राप्ती तर होतेच शिवाय सकारात्मक दृष्टी विकसित होऊन जीवनाचा योग्य मार्ग सापडत जातो.

सोबत हवी पुस्तकांची -

:ग्रंथ हेच गुरू' आणि ते आपल्या जवळचे मित्र आहेत. जीवनाबद्दलची एक 'सजग दृष्टी' देणारा तो वाटाड्या आहे. जीवलग 'सखा' आहे, याची जाणीव जवळीकतेने ग्रंथ वाचणा-याला नक्कीच होते. 'चांगली माणसं आणि चांगली पुस्तकं आयुष्याला उभारी देतात' ती सतत आपल्या बरोबर असली पाहिजेत, कारण कोणत्याही सुखदु:खात ती आपली सोबत करीत असतात.ज्येष्ठ 'कवी सतीश काळसेकर' यांचे 'वाचणा-याची रोजनिशी' हे 'साहित्य अकादमी पुरस्कार' प्राप्त उल्लेखनीय असे 'पुस्तकांविषयीचे पुस्तके' (Books on Books) या प्रकारातील आहे. त्यांचा ग्रंथसंग्रह व पुस्तकांविषयीचा प्रेमभाव सर्वांसाठीच प्रेरणादायी आहे.अनेक प्रतिभावंत लेखकांच्या पुस्तकांची ओळख करून देतानाच रसिक वाचक म्हणून आपण कसे घडलो ते या रोजनिशीतून त्यांनी सहजपणे मांडले आहे. 'वाचकांना ग्रंथांकडे घेऊन जाण्यासाठी अशी पुस्तके खूपच उपयोगी ठरतात'. कामाच्या गराड्यात 'वाचण्यासाठी वेळच नाही' अशी पळवाट शोधणारी मंडळी तासनतास व्हॉटसॅप, फेसबुकवर रमलेली दिसतात. त्यापेक्षा उत्तमोत्तम ग्रंथांचं वाचन करू. 'ग्रंथ सखा' बनून उद्याची वाचनसंस्कृती नक्की जोपासण्याचा प्रयत्न करू या.

पालकांमध्ये हवी जागरूकता -

नव्या पिढीत 'वाचनाचा मूल्यसंस्कार' करण्यात महत्वाची भूमिका आहे ती पालक व शिक्षकांची ! हल्ली मुलं वाचतच नाहीत,अशी केवळ तक्रार न करता त्यांना वाचनासाठी वातावरण निर्माण करून देण्याचं आव्हान आपल्यासमोर आहे. 'आधी केले मग सांगितले' याप्रमाणे शिक्षक व पालकांनी आपल्या चौफेर वाचनातून हा आदर्श नव्या पिढीसमोर ठेवायला हवा. त्यासाठी शाळा महाविद्दालयातील कपाटात बंदीस्त असलेली ग्रंथांची दालने मुलांना खुली करून द्यायला हवीत.बालवयातच झालेले वाचनाचे संस्कार त्यांना आयुष्यभर प्रेरणा देत राहतील. शाळेची फी भरली, वह्या पुस्तके घेऊन दिली म्हणजे आपली जबाबदारी पूर्ण होत नाही. मोबाईल, टीव्हीच्या आहारी मुलं जाणार नाहीत, यासाठी अभ्यासक्रमाच्या बाहेरची 'पूरक वाचण्यासाठीची पुस्तके' खरेदी केली पाहिजेत. इतर सर्व गोष्टींवर प्रचंड खर्च करणारी आम्ही मंडळी विकत घेऊन वाचायला मात्र आजही तयार होत नाही. खरं तर पूर्वीच्या तुलनेत आज मोठ्या प्रमाणात सर्व प्रकारची पुस्तके सहज उपलब्ध होतात.'ई-बुक'च्या स्वरूपात ती सहज मिळतात. ऑनलाईन खरेदी करता येतात.गरज आहे ती त्याबद्दलच्या 'सजग जाणिवेची व सकारात्मक दृष्टिकोनाची'.

घरात हवे पुस्तकांचे कपाट -

वाचनाचा योग्य आणि परिपूर्ण असा संस्कार हा घराघरातूनच होऊ शकतो. आधुनिकीकरणाच्या प्रभावातून सर्व प्रकारच्या 'उंची वस्तू' आपल्या घरात सहज दिसतात.मॉडर्न होण्यासाठी त्याचा आग्रह व अट्टाहास केला जातो.परंतु फारसं खर्चिक नसूनही 'पुस्तकांचं कपाट' मात्र आपल्या घरात नसतं. विकत घेऊन वाचण्याची अंगभूत सवय लागण्यासाठी शासन निर्णयाची गरज नाही. शक्य होतील तेवढी काही ना काही पुस्तके आवर्जून घरी आणली पाहिजेत. कारण घरात पुस्तकं दिसली तर ती उघडून बघण्याची, वाचण्याची प्रेरणा मुलांना मिळेल. जिज्ञासेपोटी मोकळ्या वेळेचा, सुट्टीचा त्यांचा काळ पुस्तकांच्या सानिध्यात जाईल. त्यासाठी घराची एक भिंत, एक कोपरा समृद्ध अशा ग्रंथांनी व्यापलेला असावा. आपल्याच घरातील या ग्रंथालयात 'अक्षरांची ही सुमने' घरातील सर्वांनाच जगण्याचा आनंद देत राहतील.

समृद्ध वाचनानुभव -

व्यक्तीनुसार वाचनाच्या आवडीनिवडी भिन्न-भिन्न असू शकतात. आपला विचारविवेक जागृत करण्यासाठी वाचनाचा अनुभव आपल्याला नेहमीच समृद्ध करतो. त्यातून मन व बुद्धीचा विकास जसा घडतो तशीच भाषिक, वैचारिक, भावनिक क्षमताही वाढीस लागते. आयुष्यात येणाऱ्या सर्वच अनुभवांना समर्थपणे सामोरे जाणं आणि प्रत्येक क्षण अर्थपूर्ण जगणं म्हणजे काय ते वाचनातूनच कळतं.

"असे दांडगी इच्छा ज्याची, मार्ग त्याला मिळतो सत्तर" या 'विंदां'च्या दृष्टीकोणाप्रमाणे जीवनावरील आसक्ती, सकारात्मक दृष्टी ग्रंथांच्या, पुस्तकांच्या वाचनातूनच विकसित होते. वाचनाचा हा 'अमृतानुभव' आपल्याला निखळ आनंद देतोच, शिवाय रसिकाच्या मनाची श्रीमंती वाढवितो. दु:ख पचवून आशावादी कसं जगावं, ते योग्य पद्धतीने शिकवितो. विचारांचे सामर्थ्य आपल्याला ग्रंथच देऊ शकतात.मराठी सारस्वताचं समृद्ध दालन आपल्याला सतत खूणावत राहतं. संतसाहित्यापासून आधुनिक साहित्यातील विविध प्रवाह व प्रकारातील वाङ्मयाने संपन्न असलेला हा अमृतानुभव आपण घ्यायला हवा.

चला.. जोपासू वाचन चळवळ -

'गाव तेथे ग्रंथालय', 'ग्रंथ चळवळ घरोघरी', 'फिरती वाचनालये' 'ग्रंथ महोत्सव' इथपासून ते 'पुस्तकांचं गाव' असे अनेक उपक्रम ग्रंथ चळवळ रूजविण्यासाठी शासनस्तरावर राबविले जातात. तरीही वाचनाची ही चळवळ फक्त कागदोपत्रीच विकसित होते की काय, अशी शंका वाटत राहते.‌ आजची शासकीय व सार्वजनिक ग्रंथालये, शाळा महाविद्यालयांची ग्रंथालये अजूनही अत्याधुनिक झालेली दिसत नाहीत. त्यांना शासनाकडून वेळेवर न मिळणारे अनुदान, रोडावलेली सभासद संख्या, कर्मचारी वर्गाची उदासिनता, त्यांचे अनेक वर्षातील प्रलंबित प्रश्न अशा अडचणीत हा ग्रंथव्यवहार अडकलेला आहे. दुर्दैवाने शासकीय पातळीवर त्याचा गंभीर विचार आजही होताना दिसत नाही.'रिकामी वाचनालये व उदास वाचकवर्ग' असे चित्र सर्वत्र दिसते आहे. वाचकाला वाचनासाठी प्रवृत्त करण्याची धडपड काही अपवाद वगळता फारशी होताना दिसत नाही. ग्रंथ चळवळ हा एक सामाजिक जबाबदारीचा भाग आहे; पण त्याला आता उतरती कळा लागली आहे, असे खेदाने म्हणावे लागते. याबाबत ग्रंथालयांचे आर्थिक सबलीकरण करणे, ग्रंथालयशास्रातील नव्या तंत्रज्ञानाचा उपयोग करणे, वाचनासाठी पोषक वातावरण निर्माण करणे महत्वाचे ठरेल.

Importance Of Reading
Fake Currency Racket | बनावट नोटांची ‌‘टांकसाळ‌’!

'ज्योत से ज्योत जगाते चलो' -

शेवटी ग्रंथ चळवळ जतन व वृद्धींगत करण्यात अशी अनेक आव्हाने व अडचणी असल्या तरी वैयक्तिक पातळीवर वाचनाची ही संस्कृती जतन करण्यासाठी आपण कटिबद्ध होऊ या 'ज्योत से ज्योत जगाते चलो' या भावनेतून मी माझ्यापासून सुरवात केली तर ही 'वाचनवेल' पुन्हा एकदा नक्की बहरून येईल,असा विश्वास वाटतो. प्रत्येक वाचकाचा ग्रंथाशी घडणारा हा 'भावसंवाद' आपणास समृद्ध करणारा ठरेल. वाचन ही गरजेचीच नाही तर अपरिहार्य अशी गोष्ट आहे. वृत्तपत्र - नियतकालिकांच्या वाचनातून 'वर्तमान' जाणून घेत 'अपडेट' राहू या. विनोदी कला- साहित्यातून मनाचं रंजन करून घेऊ. चरित्र-आत्मचरित्रातून प्रेरणा-प्रोत्साहन घेऊ. विज्ञान तंत्रज्ञानातून ज्ञान मिळवू. काव्यात्म वाचनातून सौंदर्यदृष्टी शोधू. शोकनाट्यातून दु:ख पचविण्याची क्षमता आत्मसात करू.आधुनिक व समकालीन साहित्यातून आजचं जग अनुभवत नव्या दिशेचा शोध घेऊ. एकूणच मनातला अंधार दूर करून अंतरीचा दीप लावण्यासाठी'. 'टेकवा टेकवा ग्रंथाशीच माथा' असा भाव मनी बाळगून ही 'वाचन प्रेरणा' समाजातील सर्व घटकांना समृद्ध करेल आणि 'बलसागर भारताचं' आपलं स्वप्न नक्कीच पूर्ण होईल.

(लेखक के.एम.सी.महाविद्यालय, खोपोली येथे मराठी विषयाचे प्राध्यापक आहेत.

kmarathidept@gmail.com)

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news