दिवस कुठे सुरू होतो आणि कुठे संपतो, हे कळतच नाही. वेळच मिळत नाही, अशी वाक्ये आपण बर्याच महिलांच्या तोंडी ऐकतो. सतत वेळ न पुरण्याची तक्रार करणार्या व्यक्ती वेळेचे नियोजन योग्यप्रकारे करत नसतात. म्हणूनच त्यांना कायम कामाची घाई होते. एखाद्या ठिकाणी उशिरा पोहोचणे, उत्साह कमी होणे, त्रागा करणे, कामाची टाळाटाळ करणे, आयुष्यातील विविध पर्यायांचा आणि ध्येयाचा विचार करता न येणे यासारख्या समस्यांना सामोरे जावे लागते.
वास्तविक पाहता वेळेचे नियोजन फारसे अवघड नाही. ते शिकल्यानंतर आपल्या जगण्याचा दर्जा सुधारतो. कारण, आपण योग्य त्या कामांना योग्य तो वेळ देऊ शकल्यामुळे जगण्याचा आनंद वाढतो. वेळेचे नियोजन करताना आणि आपल्याला काय हवे आहे, हे ठरवताना काही मुद्दे लक्षात घ्यावे.
आपण ज्यावेळी तणावमुक्त असतो, तेव्हा आयुष्यातील अधिक महत्त्वाच्या आणि तुलनेते कमी महत्त्वाच्या गोष्टींची नोंद करावी. आपले करिअर, आरोग्य, घर, कुटुंब, आर्थिक व्यवहार, सामाजिक जबाबदार्या, धार्मिक गोष्टी, मनःशांती, अशा अनेक गोष्टी आपल्या मनात असतात. या सर्व गोष्टींचा व्यवस्थित क्रम लावावा आणि त्यांची प्राथमिकता ठरवावी. काळानुसार यामध्ये आपण बदलही करू शकतो.
आणखी एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे, आयुष्यातील ध्येय निश्तिच करतेवेळी ते आपल्या आवाक्यात आहे का? त्यासाठी किती मेहनत घ्यावी लागेल आणि किती वेळ द्यावा लागेल, याचा प्रामाणिक हिशेब करावा. तरच या ध्येयपूर्तीच्या मागे धावतानाही करमणुकीला, आरोग्याला महत्त्व देता येऊ शकेल. कारण, या गोष्टीही तेवढ्याच महत्त्वाच्या आहेत. शक्यतो दिवसभराचे वेळापत्रक बनवावे आणि त्यानुसारच वाटचाल करण्याचा प्रयत्न करावा. काही वेळा वेळ पुढे-मागे होऊ शकते; पण त्या-त्या वेळेची कामे तेव्हाच करावीत. टाळाटाळ केल्यास आपल्यालाच त्रास होतो, हे लक्षात घ्यावे.
दिवसाच्या कामाची यादी करताना त्यात तीन टप्पे ठेवावे. पहिला भाग सर्वात महत्त्वाचा आणि आवश्यक कामांचा ठेवावा. दुसरा भाग महत्त्वाच्या पण कमी वेळ लागणार्या कामांचा ठेवावा आणि तिसर्या भागात ते काम पुढे ठकलले तरी चालेल, अशांचा समावेश करावा. दोन्ही भागांतील कामे झाल्यानंतर वेळ शिल्लक राहिला, तर तिसर्या भागातील कामे करावीत. म्हणजे, कामांची घाई, चिडचिड, निराशा, अस्वस्थता या गोष्टी समोर येणार नाहीत.