

नवी दिल्ली : 'नीट'चे संगणक आधारित चाचणीमध्ये रूपांतरण सध्या सक्रिय विचाराधीन आहे. तसेच जेईईप्रमाणे ही परीक्षाही दोन टप्प्यांत ऑनलाईन घेण्याचा विचार करत आहे, असे केंद्र सरकारने सर्वोच्च न्यायालयात सादर केलेल्या प्रतिज्ञापत्रात म्हटले आहे.
'जेईई'सारख्या मॉडेलची सुरुवात टप्प्याटप्प्याने करण्याचा विचार सरकार करत आहे. उच्चस्तरीय कार्य दलाच्या शिफारशींचा विचार केल्यानंतर सर्व घटकांशी सल्लामसलत करून आणि विद्यार्थ्यांना पुरेशी पूर्वसूचना दिल्यानंतरच अंतिम निर्णय घेतला जाईल, असेही केंद्राने नमूद केले आहे.
नीट पेपरफुटीच्या वादानंतर केंद्र सरकारने राष्ट्रीय परीक्षा संस्थेच्या (एनटीए) परीक्षा प्रक्रियेत व्यापक फेरबदल केले आहेत. राष्ट्रीय प्रवेश परीक्षांची अखंडता सुनिश्चित करण्यासाठी आता बहुस्तरीय सुरक्षा प्रणाली कार्यान्वित करण्यात आली आहे, अशी माहितीही न्यायालयाला देण्यात आली. एनटीएमध्ये संरचनात्मक सुधारणांची मागणी करणाऱ्या याचिकांना उत्तर देताना, केंद्र सरकारने न्यायालयाच्या २९ मे २०२६ च्या आदेशानुसार अवलंबलेल्या उपाययोजनांचा तपशील दिला.
शिक्षण मंत्रालयाच्या उच्च शिक्षण विभागातील सचिव, अरविंद कुमार सिन्हा यांनी दाखल केलेल्या प्रतिज्ञापत्रात नमूद केले की, जरी एनटीएने अनेक राष्ट्रीय परीक्षा संगणक आधारित चाचणीमध्ये रूपांतरित केल्या असल्या तरी नीट ही तिच्या व्याप्तीमुळे आणि सर्वसमावेशकतेमुळे लेखी स्वरूपात घेतली जाणारी एकमेव प्रमुख परीक्षा आहे. या परीक्षा प्रक्रियेत अलीकडे करण्यात आलेल्या सुधारणांची माहितीही प्रतिज्ञापत्रात देण्यात आली आहे.