

कल्याण | पुढारी ऑनलाइन डेस्क - कल्याण पश्चिम येथील लालचौकी भागात बुधवारी (दि.8) सकाळी केडीएमसीच्या भरधाव ट्रक चालकाने रस्ता ओलांडत असलेल्या महिलेसह तिच्या चिमुरड्याना चिरडले. या दोघांना तत्काळ केडीएमसी पालिकेच्या रुक्मिणीबाई रुग्णालयात दाखल करण्यात आले. तत्पूर्वीच त्यांचा मृत्यू झाला.
पालिका, रस्ते नियंत्रक एमएमआरडीए आणि वाहतूक पोलिसांच्या निष्क्रियतेचा हा बळी आहे, असा आरोप करत मनसेचे कल्याणचे माजी आमदार प्रकाश भोईर यांनी या प्रकरणातील दोषींवर कठोर कारवाई व्हावी, या मागणीसाठी लालचौकी भागात रस्त्यावर आंदोलन केले. यामध्ये नागरिकांनी उत्स्फूर्तपणे सहभागी नोंदवून रस्ता रोको केला आहे.निशा सोमेसकर (३७) आणि अंश सोमेसकर (३) अशी मृत आई, मुलाचे नाव आहे. शिवाजी चौक ते दुर्गाडी पूल हा सर्वाधिक वर्दळीचा रस्ता आहे. या रस्त्यावरून सर्व प्रकारची वाहने भरधाव वेगात धावत असतात. बुधवारी (दि.8) सकाळी निशा सोमेसकर मुलगा अंश याच्यासह लालचौकी भागातून चालल्या होत्या. लालचौकी येथे रस्ता ओलांडत असताना एक ट्रक दूरवर असताना त्या रस्ता ओलांडून जात होत्या. तेवढ्यात भरधाव वेगात असलेल्या एका ट्रकने निशा आणि अंश यांना गाठले. या दोघांचा ट्रकच्या धडकेत जागीच मृत्यू झाला.
दोघांना तातडीने पालिकेच्या रुक्मिणीबाई रुग्णालयात नेण्यात आले. तत्पूर्वीच त्यांचा मृत्यू झाला होता. ट्रक चालकाच्या निष्काळजीपणावर नागरिकांनी तीव्र संताप व्यक्त केला. शहरातून भरधाव वेगाने वाहने धावत असताना त्यांच्यावर वाहतूक पोलीस, आरटीओ अधिकारी कारवाई करत नाहीत. त्यामुळे हे अपघात होतात, अशी टीका मनसेचे माजी आमदार प्रकाश भोईर यांनी केली. अपघाताची माहिती मिळताच बाजारपेठ पोलीस घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी ट्रक चालकाला ताब्यात घेतले असीे. हा ट्रक कल्याण डोंबिवली पालिकेच्या सेवेत असल्याचे ट्रकवरील चिन्हावरुन स्पष्ट होते.
आई, मुलाच्या अपघाताविषयी तीव्र हळहळ व्यक्त करत माजी आमदार प्रकाश भोईर यांनी लालचौकी येथे भर रस्त्यात आंदोलन सुरू केले. हा रस्ता एमएमआरडीएच्या नियंत्रणाखाली आहे. त्यामुळे या रस्त्याकडे कल्याण डोंबिवली पालिका लक्ष देत नाही. या रस्त्याचे दुभाजक वाहने वळण्यासाठी मनमानीप्रमाणे काढले जातात. त्यावर एमएमआरडीए अधिकाऱ्यांचे लक्ष नाही. या वर्दळीच्या रस्त्यावर वाहतूक पोलीस तैनात नसतात. त्यामुळे वाहन चालक मनमानी करत भरधाव वेगाने वाहने चालवत असता. त्यात निष्पापांचे नाहक जीव जात असल्याचे माजी आमदार भोईर यांनी सांगितले. रस्त्यावरील काढलेले रस्ता दुभाजक पुन्हा बसविण्यात यावे. वर्दळीच्या रस्त्यावर सतत वाहतूक पोलिसांची गस्त असावी, अशी मागणी देखील त्यांंनी यावेळी केली.